Thursday, October 30, 2025
Happy Diwali

'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्ताने भारत तीन देशांशी लढला

'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्ताने भारत तीन देशांशी लढला
नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्ताने भारत तीन देशांशी लढला. पाकिस्तानचे सैन्य तसेच चीन आणि तुर्कीयेच्या तंत्रज्ञानाचा आणि त्यांच्या विविध उपकरणांचाही भारताने यशस्वी मुकाबला केला. ही माहिती भारताचे उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी दिली. ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. चीन हेरगिरी करुन भारताविषयी मिळवलेली माहिती पाकिस्तानला पुरवतो. पण ही माहिती मिळूनही पाकिस्तानला त्याचा फायदा घेणे जमलेल नाही, असेही उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह म्हणाले. मागील पाच वर्षात पाकिस्तानने जी शस्त्रे खरेदी केली त्यात ८१ टक्के चिनी शस्त्रे होती. यामुळे भारत ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने पाकिस्तानच्या सैनिकांशी तसेच चीन आणि तुर्कीयेच्या तंत्रज्ञान आणि उपकरणांशी लढला. सुरवातला ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांचे तळ नष्ट करण्यापुरते होते. पण पाकिस्तानने प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला आणि भारताला कारवाईचा थोडा विस्तार करावा लागला. पण भारताने वेगाने आणि प्रभावीरित्या उत्तर दिले. यामुळे ऑपरेशन सिंदूर मर्यादीत काळात मोठे यश मिळवू शकल्याचे भारताचे उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह म्हणाले. भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या संघर्षात चीन आणि तुर्कीये यांनी त्यांच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेतली. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने चीन आणि तुर्कीये यांनी पाकिस्तानचा वापर युद्ध साहित्याच्या चाचणीची प्रयोगशाळा म्हणून केला. पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे २६ नागरिकांची हत्या केली. मृतांमध्ये परदेशी नागरिकही होता. यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर केले. भारताने पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या नऊ तळांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले.
Comments
Add Comment