Thursday, July 3, 2025

“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी

“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
मुंबई: सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. निवडणुकी आधी शेतकऱ्यांना आश्वासन द्यायची आणि सत्ता आल्यावर मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या. सोयाबीन आणि धानाला भाव द्या, असे विजय वडेट्टीवार यांनी आजच्या सभेत म्हटले आहे.

बळीराजाच्या विविध प्रश्नावर २९३ च्या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. राज्यात अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना निवडणुकी आधी कोरडवाहू पिकांसाठी १३,५००, बागायतीसाठी २७,००० तर फळबागांसाठी ३६,००० रुपये इतकी मदत आणि ३ हेक्टरपर्यंतची मर्यादा निश्चित होती.पण आता सत्ता आल्यावर मात्र निवडणुकीनंतर कोरडवाहूसाठी ८,५००, बागायतीसाठी १७,००० आणि फळबागांसाठी २२,००० इतकी घटवण्यात आली.इतकचं नाहीतर ३ हेक्टची मर्यादा २ हेक्टर करण्यात आली. निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे महायुतीने आश्वासन दिले होते आता मात्र कर्जमाफीसाठी समिती नेमण्याची भाषा वापरली जाते. शेतकऱ्यांना समिती नको तर कर्जमाफी करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट भाव देऊ असे सांगणारे आता सोयाबीन आणि धानाला हमीभाव ही मिळत नाहीये. राज्याचे कृषिमंत्री हे पदावर बसून सतत शेतकऱ्यांचा अपमान करणारी विधान करत आहे .कृषी खाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे अस कृषिमंत्र्यांना वाटते यावरून ते किती असंवेदनशील आहेत हे स्पष्ट होते. शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या या कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा त्यांना हवे ते मलईदार खाते द्यावे पण शेतकऱ्यांच्या अपमान करणारे कृषिमंत्री नको अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

सत्ताधारी मंत्री ,आमदार सगळेच बळीराजाचा अपमान करत आहे. आम्ही शेतकऱ्यांना पैसे दिले, मोदींनी सहा हजार रुपये दिली ही उपकाराची भाषा बोलली जाते.एकीकडे सहा हजार रुपये दिले पण खताचे भाव किती वाढले, युरियाचे भाव काय आहेत? रासायनिक खतांची किंमत वाढली, पिकासाठी औषधांची किंमत वाढली म्हणजे एका खिशात टाकले आणि दुसऱ्या खिशाला कात्री लावली त्यात शेतमालाला भाव मिळत नाही मग शेतकऱ्यांना पैसे दिले ही कसली भाषा आहे? असा सवाल विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी उपस्थित केला. राज्यात विविध प्रकल्पांसाठी सरकार निधी देते, उद्योगपतींचे कर्ज सरकार माफ करते पण शेतकऱ्यांना मदत करताना मात्र सरकारच्या हाताला लकवा मारतो का? अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

शक्तिपीठ महामार्गाला विरोधक विरोध करतात असा आरोप करतात पण शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्ग नकोय, त्यांची सुपीक जमीन या महामार्गात जाणार आहे.विरोधक हा शेतकऱ्यांचा आवाज आहे त्यामुळे आम्ही विरोध करत आहोत अस वडेट्टीवर यांनी स्पष्ट केले.

सोयाबीन ,कापसाला भाव मिळाला नाही.पीक लावताना जो खर्च झाला तो देखील शेतकऱ्यांचा निघत नाहिये. धानाचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही आम्ही सरकारला ओरडून सांगत आहोत पण सरकार मान्य करायला देखील तयार नाहीये. पीकविमा कंपन्यांनी देखील शेतकऱ्यांची फसवणूक केली. शेतकरी पैसे भरतात पण त्यांना विमा मिळत नाही. पीक विमाच्या नावाखाली कोणीं पैसे उचलले? शेतजमीन दाखवून कोणत्या अधिकाऱ्यांनी पैसे लाटले याची चौकशी व्हायला हवी अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >