अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयासोबतच तिच्या खाजगी आयुष्यात देखील तितकीच ऍक्टिव्ह असते.अनेक वेळा ती तिच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवताना दिसते. असे खास क्षण ती तिच्या इंस्टाग्राम हॅण्डल वरून सतत शेअर करत असते. आताच काही दिवसांपूर्वी प्राजक्ता तिच्या आजोळी म्हणजे पंढरपुरात गेली होती. कारणही तसेच खास होत. एक खास कार्यक्रमाचं निमित्त साधत सहकुटूंब ती तिच्या आजोळी गेली होती. तिने कॅप्शन मध्ये तिथे जाण्याचं कारण सांगितलं आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणते की, गावची कावड. नायकाची भाळवणी- पंढरपूर- कावडीमागची गोष्ट -शिंदे - लोखंडे - जीवाभावाचे मित्र. लोखंडेंनी शिखरशिंगणापूरला राजाकडून मान- निशाणी मिळवण्यासाठी दांडपट्ट्यामध्ये जिंकून तो मिळविण्याचा पण केला. ते जिंकले, मान मिळाला पण दांडपट्टा खेळत असता लोखंडेंची प्राणज्योत मालवली, मैत्रीत खंड पडला. शेवटच्या घटका मोजत त्यांनी शिंदेकडून वचन घेतलं, “जोवर आकाशात चंद्र- सूर्य आहेत तोवर आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून शिंदे- लोखंडे अशा दोन्ही कावडी एकत्र शिखरशिंगणापूरला जातील. त्यात खंड पडणार नाही. आणि तोवर मानाप्रमाणे दोन्हीं कावडींच्या पताकांची नक्कल कोणीही करू शकणार नाही.” गेल्या कित्येक पिढ्यांपासून भाळवणीकर दोन मित्रांचं हे वचन प्राणपणानं जपतात.आजही जेव्हा कावडी शिखरशिंगणापूरला जातात भाळवणी निर्मनुष्य होते. त्यामिमित्ताने चार पिढ्या एकत्र आल्या.लेकरांना कोकरं - पिल्लं भेटली.श्री क्षेत्र तुळजापूर.आई तुळजाभवानी.
प्राजक्ताचं आजोळ पंढरपुरात भाळवणी गावात आहे. या गावात कावड यात्रा प्रसिद्ध आहे. प्राजक्ता दरवर्षी या यात्रेला जाते. तिने शेअर केलेल्या फोटोत तिचे कुटुंबीयदेखील आनंदात दिसत आहेत.त्याचप्रमाणे प्राजक्तादेखील सर्व धार्मिक विधीमध्ये सहभागी होताना दिसत आहे. प्राजक्ताची सध्या बारा ज्यातिर्लिंग यात्रा सुरु आहे. ती अभिनयासोबतच सांस्कृतिक वारसा जपताना दिसते. प्राजक्तराज दागिन्यांचं दालन तिचं असून या माध्यमातून पारंपरिक दागिने ती ग्राहकांसाठी उपलब्ध करून देते. फुलवंती या चित्रपटातून प्राजक्ताने उत्तम अभिनयातून आपली वेगळी छाप रसिकांच्या मनावर पाडली.