
भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी
प्रजापतीने सृष्टीची निर्मिती केली तेव्हा त्याला वाटले, आपण निर्माण केलेल्या या सृष्टीसमोर युगानुयुगे सत्कार्याचा आदर्श उभा करतील, अशा तेजस्वी विभूतींचा अवतार व्हावा, यासाठी त्याने एका त्रिसंवत्सर यज्ञसत्राचे आयोजन केले होते. अशा दीर्घ सत्रात कथा, गायन, कीर्तन होत असतेच. शास्त्रशुद्ध आरोह अवरोहानी युक्त अशा अव्याहत चालणाऱ्या वेदमंत्रांनी तसेच सुस्वर सामगायनाने त्या सत्रात साक्षात वाक्देवी प्रकट झाली. तिला पाहताच प्रजापती व वरुणदेवता या दोहोंची नवनिर्माणाची कामना उफाळून आली. त्या कामनेचे ओजस्वी वीर्य वाऱ्याने यज्ञाग्नीत टाकले गेले. तेव्हा त्यातून भृगू आणि अंगिरा ही अग्नीसारखी तेजोमय अशी सुंदर बालके जन्माला आली. त्या बालकांना पाहून अजून असेच बालक आपल्याला मिळावे म्हणून वाक्देवीने प्रजापतीला विनंती केली. तिची विनंती मान्य करून प्रजापतीने अजून एक तसाच दिव्य पुत्र उत्पन्न केला. तेच अत्री ऋषी होत. म्हणजेच अत्रीमहर्षींचे पिता साक्षात विधाता प्रजापती आणि माता प्रत्यक्ष वाक्देवी सरस्वती...!
अत्री ऋषी भृगू व अंगिरा ऋषींइतकेच तेजस्वी असले तरी त्यांची तेजस्विता शीतल चांदण्यासारखी होती. ते मुळात सौम्य, मधुर आणि विशाल अंतःकरणाचे महर्षी होते. मात्र अन्यायी, लालची लोकांवर ते प्रखरपणे प्रहारही करतात. जुलमी राजवटीविरुद्ध लोकशाहीचा पुरस्कार करणारे अत्रीमहर्षीं पहिले द्रष्टे होत. तसेच सूर्यग्रहणाबद्दल लोकांची भयग्रस्त कल्पना काढण्यासाठी ग्रहणाचे अचूक गणित मांडणारे अत्रीमहर्षीच होत. सत्त्व, रज, तम या त्रिगुणांच्या पलीकडे असणाऱ्या शुद्ध सत्त्वात स्थिर असल्यामुळे ते अत्री मानले जातात. स्वायंभुव, स्वारोचित आणि वैवस्वत या तिन्ही मन्वतरातील सप्तर्षींमध्ये अत्री महर्षींची गणना होते. म्हणजे या तिन्ही मन्वंतरात अत्रीमहर्षी लोकांच्या नजरेसमोर आदर्शभूत होते. हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजेच ब्रह्मदेवाची उत्कृष्ट निर्मिती होते. यांची उत्पत्ती ब्रह्मांच्या डोळ्यांपासून झाली, असेही मानले जाते.
साक्षात ब्रह्मांचेच डोळे, म्हणजे त्या डोळ्यांत अवघ्या जगाबद्दलची वत्सलता, करुणा ओतप्रोत भरलेली असणार, ज्ञानाचे दिव्य तेज विलसत असणार ! आणि त्या डोळ्यांपासून अत्रींची उत्पत्ती झाली म्हणजे वात्सल्याची, करुणेची, ज्ञानाची गंगा अत्रींच्या रूपाने वाहू लागली. ऋग्वेदाचे पाचवे मंडल याची साक्ष देते. ८७ सूक्तांच्या या मंडलास आत्रेय मंडल म्हणतात. या मंडलाचे द्रष्टे महर्षी अत्री होत. यात ऋग्वेदीय स्वस्तिसूक्त आहे. यास कल्याणसूक्त, मंगलसूक्त, श्रेयसूक्तही म्हटले जाते. आजही हे सूक्त प्रत्येक मंगल कार्यात शुभ संस्कारांसाठी, कल्याण, अभ्युदय, भगवत्कृपेसाठी सस्वर पठन केले जाते. त्यातून अत्रीमहर्षींची उदात्त लोककल्याणाची भावना प्रकट होते.
स्वस्ति पन्थां अनु चरेम सूर्यचन्द्रमसौ इव ।
पुनः ददता अघ्नता जानता सं गमेमहि ।। ऋ. मं. ५सू. ५१. १५
आम्ही सूर्यचन्द्रांप्रमाणे कल्याणप्रद मार्गच अनुसरावा. कोणाचाही द्वेष न करता, गरजवंतांना वारंवार दान देऊन समर्थ करीत, ज्ञानसंपन्न होऊन एकजुटीने या भवसागराला पार करावे, असे उदात्त भाव अत्री महर्षींच्या ऋचेत आहेत. त्यांचे खालील पर्जन्यसूक्तही खूप सुंदर आहे. त्याचा मी भावानुवाद
केला आहे.
प्रवाताः वान्ति पतयन्ति विद्युतः उत् ओषधीः जिहते पिन्वते स्वः।
इरा विश्वस्मै भुवनाय जायते यत् पर्जन्यः पृथिवीं रेतसा अवति ।।४।।
यस्य व्रते पृथ्वी नन्नमिती यस्य व्रते शफवत् जर्भुरीति ।
यस्य व्रते ओषधीः विश्वरूपाः सः नः पर्जन्य महिसर्म यच्छ ।। ऋ.मं.५सू.८३.५।।
जलवीर्य घेऊनि मेघ आले पृथ्वीकडे धावत । वाहू लागला पवनही वेगे अति उत्साहभरीत ।।
विजेचेही नर्तन चाले कडकडणाऱ्या तालावरती । वसुंधरेला भेटायाला कधी आवेगे ये चपला ती ।।
पर्जन्याचे जल पिऊनि ये तरारुनि वन हे सारे । स्वच्छ होऊनि आसमंत समृद्धीची उघडी दारे ।।
विश्वहितास्तव सस्यश्यामला वसुधा झाली । त्या भूमीच्या स्तन्यावरती जीवलेकरे पुष्ट झाली ।।
ज्याच्यामुळे तृप्त होऊनि धनधान्य धरणी देई । ज्याच्यामुळे गोधन सारे सतेज संपन्न होई ।।
ज्याच्यामुळे वृक्षवल्लरी टवटवीत सुरंगी झाली । तो पर्जन्य आम्हालागी समृद्धीचा होई वाली ।।
(पूर्वार्ध) : [email protected]