
उच्च न्यायालयाने फेटाळल्या सर्व याचिका
मुंबई : दादरस्थित महापौर बंगल्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मोकळा केला. स्मारकाच्या निर्णयाला २०१७ मध्ये विविध याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले होते. या याचिका मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने या याचिकांवर निर्णय देताना या याचिका फेटाळल्या. आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या याचिकांवर खंडपीठाने गेल्या आठवड्यात दोन तास सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर व याचिकाकर्ते, राज्य सरकार आणि स्मारक समितीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता.
महापौर बंगल्यात होऊ घातलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला माहिती अधिकार कार्यकर्ते भगवानजी रयानी, जनमुक्ती मोर्चा या संस्थेचे अध्यक्ष मानव जोशी, पंकज राजमाची यांनी स्वतंत्र जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते.
महापौर बंगला पुरातन वारसा वास्तू आहे. हा परिसर किनारा नियंत्रण क्षेत्रात (सीआरझेड) मोडतो, असे असतानाही त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा घाट घातल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील उदय वारुंजीकर यांनी केला होता. स्मारक समितीवर ठाकरे कुटुंबातील दोघांना नियमांचे उल्लंघन करून आजीवन सदस्यत्व देण्यात आल्याचा दावाही वारुंजीकर यांनी केला होता.
दुसरीकडे, सर्व निकष आणि नियमांचे पालन करूनच निर्णय घेण्यात आल्याचा प्रतिदावा न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला होता.
मूळ वास्तूला धक्का नाही
महापौर बंगला पुरातन वारसा वास्तू असल्यामुळे या वास्तूला धक्का लावलेला नाही. बाळासाहेब ठाकरे स्मारक तळघरात उभारण्यात आल्याची माहिती समितीच्या वतीने वरिष्ठ वकील दरायस खंबाटा यांनी न्यायालयाला दिली. तसेच, ठाकरे स्मारक पूर्णतः तयार आहे, तथापि, हे स्मारक सर्वसामान्यांसाठी अद्याप खुले का करण्यात आले नाही, याबाबत खंबाटा यांनी आश्चर्य व्यक्त केले.