
आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई
पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी अंतर्गत येणाऱ्या सुखडआंबा गावातील जलजीवन पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून १७ मार्च २०२५ रोजी दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत आमदार विनोद निकोले यांनी १ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. निकोलेंच्या प्रश्नाला उत्तर देताना पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करत असल्याचे जाहीर केले.
सुखडआंबा येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. १७ मार्च रोजी तीन शाळकरी मुली येथील पाण्याच्या टाकीवर चढल्या व खाली उतरत असताना टाकीचा स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर एक विद्यार्थिनी या घटनेत जखमी झाली होती. या प्रकरणात मे. हरेश बोअरवेल या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कंत्राटी अभियंत्यास सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले होते. संबंधित पाण्याच्या टाकीच्या बांधकामाबाबत वीर जिजामाता इन्स्टिट्यूट मुंबई यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी पाणी पुरवठा विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मृत मुलींच्या कुटुंबीयांना अधिकची भरपाई द्यावी यासाठी आमदार विनोद निकोले यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. आमदार निकोलेंच्या प्रश्नाला उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी पाणी पुरवठा विभगातील उपअभियंता बी. के. शिंदे आणि कार्यकारी अभियंता आर.आर. पाध्ये यांचे तत्काळ निलंबन करत असल्याचे जाहीर केले. तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याची सूचना देण्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले असून, मृत मुलींच्या कुटुंबीयांना अधिकची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही दिले.