Tuesday, July 1, 2025

ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात वाढला भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाचा डंका; ‘या’ देशाचा ‘आकाश’मध्ये रस

ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात वाढला भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाचा डंका; ‘या’ देशाचा ‘आकाश’मध्ये रस

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांना धूळ चारली होती. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय सीमावर्ती शहरांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारताच्या अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालीने त्या हल्ल्यांना यशस्वीपणे परतावून लावले होते. या घटनेमुळे भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाची जगभरात व्यापक चर्चा झाली आणि अनेक देशांचे त्यावर लक्ष केंद्रित झाले.


आता या यशाचा परिणाम म्हणजे ब्राझीलने भारतीय संरक्षण प्रणालींमध्ये गंभीर रस दाखवला आहे. पुढील आठवड्यात होणा-या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिण अमेरिकन दौ-याच्या अनुषंगाने ब्राझीलने भारताची आकाश हवाई संरक्षण प्रणाली आणि गरुड तोफा यासह अनेक संरक्षण उपकरणे खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.



परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव पी. कुमारन यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की ब्राझीलसोबत संरक्षण सहकार्य वाढवण्यावर सखोल चर्चा होणार आहे. संयुक्त संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि प्रशिक्षण देवाणघेवाणीच्या क्षेत्रात दोन्ही देश एकत्र काम करण्याचे नियोजन करत आहेत. कोणत्या प्रकारचे संरक्षण सहकार्य शक्य आहे आणि ब्राझीलला कोणकोणत्या संरक्षण प्रणाली विकता येतील यावर अजूनही चर्चा सुरू आहे.


कुमारन यांनी आणखी माहिती देताना सांगितले की ब्राझीलच्या काही विशिष्ट गरजा आहेत ज्यात भारत मदत करू शकतो. त्यांना युद्धभूमीवर सुरक्षित संपर्क प्रणालींची आवश्यकता आहे तसेच ऑफशोअर पेट्रोलिंग पोतांमध्येही त्यांचा मोठा रस आहे. ब्राझीलकडे स्कॉर्पिन पाणबुड्या आहेत आणि त्या पाणबुड्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी भारतासोबत भागीदारी करण्याची त्यांची इच्छा आहे. त्याशिवाय आकाश हवाई संरक्षण प्रणाली आणि गरुड तोफा यांमध्येही त्यांना प्रचंड रस दिसत आहे.



संरक्षण उद्योगातील संयुक्त उपक्रमांमध्येही ब्राझीलची आवड आहे. एम्ब्रेअर कंपनी आणि सर्वसाधारणपणे विमान उद्योगात ब्राझीलची मजबूत स्थिती पाहता दोन्ही देशांमध्ये या क्षेत्रात काम करण्याच्या अपार संधी आहेत.


भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने विकसित केलेली आकाश क्षेपणास्त्र प्रणाली ही एक अत्याधुनिक मध्यम पल्ल्याची, फिरती जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. या प्रणालीची खासियत म्हणजे ती लढाऊ विमाने, ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि हवेतून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे अशा विविध प्रकारच्या हवाई धोक्यांना प्रभावीपणे रोखू शकते.


या संरक्षण प्रणालीचा पल्ला २५ ते ४५ किलोमीटर आहे आणि २० किलोमीटर उंचीपर्यंतच्या लक्ष्यांना ती अचूकपणे भेदू शकते. त्याचा सुपरसॉनिक वेग मॅक १.८ ते २.५ इतका आहे जो त्याला अत्यंत प्रभावी बनवतो. ऑपरेशन सिंदूरनंतर या प्रणालीच्या कार्यक्षमतेची जगभरात दखल घेण्यात आली आहे आणि आता अनेक देश या तंत्रज्ञानाकडे आकर्षित होत आहेत.

Comments
Add Comment