
कचराकुंडीत कचरा जमा करण्याचे पालिकेकडून आवाहन
वसई : वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. वाढते नागरिकीकरणाच्या मानाने कचराही तितकाच वाढू लागला आहे. प्रति दिन ७०० टन कचरा हा शहरातून जमा होतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाकडून क्षेपणभूमीवर जमा केला जात आहे.
वसई, नालासोपारा, विरार आणि नायगाव ही प्रामुख्याने शहरे व गावातील भागाचा समावेश महापालिकेत आहे. त्यामुळे घरातील ओला आणि सुका कचरा अधिक असतो. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नियमित नियोजन केले जात आहे; मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे.
पावसाळ्यात साचलेले पाणी, कचरा यामुळे डासांची उत्पत्ती होत असते. परिणामी, डेंगी, मलेरिया, ताप यांसह अन्य आजार उद्भवत असतात. आरोग्य विभागाकडून दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करूनही खाद्यपदार्थांचे वेष्टन, नाशवंत वस्तू यांसह प्लॅस्टिकसह अन्य कचरा दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने उपायोजना आखाव्यात, अशी मागणी केली जात आहे. नागरिकांनी कचरा कुठेही न भिरकावता कचराकुंडीत जमा करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.
कचरा वर्गीकरण करावे
कचऱ्याचे वर्गीकरण करून नागरिकांनी स्वतंत्र दोन डब्यांत कचरा जमा करावा, असे आवाहन केले; मात्र तरीही वर्गीकरण होत नाही. त्यामुळे महापालिका स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना हा कचरा वेगळा करून नंतर क्षेपणभूमीवर न्यावा लागत आहे. पालिकेला सहकार्य करून कचरा वर्गीकरण करावे, असे आवाहनही वेळोवेळी केले जात आहे.
स्वच्छता विभागाकडून नियमित कचरा उचलला जात असतो. कचरा इतरत्र न टाकता प्रत्येक भागात येणाऱ्या कचरागाडीत किंवा कचराकुंडीत जमा करावा. ज्या भागात कचरा अधिक निर्माण होत असेल, तिथे नियोजन केले जाईल.
- अर्चना दिवे, उपायुक्त