
श्रीवर्धन : मुंबईवरून बोर्लीकडे आलेली बस बोर्लीवरून आदगाव, सर्वे तसेच दिघीकडे मार्गस्थ होत असताना बोर्ली येथील जागृत नागरिकांच्या कर्तव्य दक्षतेमुळे मोठी दुर्घटना होताना टळली आहे.
सदरील बस बोर्ली स्थानकामध्ये उभी असताना मागील टायरचे एक्सेलचे नट लूज असल्याचे निदर्शनास आले. यानंतर चालकाला कल्पना देऊन बस बाजूला लावण्यास सांगितले. डिप्रेशनच्या सहाय्याने टायरला फिरवण्याचे काम करणाऱ्या एक्सलला एकूण ८ नट असतात. त्यापैकी फक्त ३ नट एक्सलला लागले होते. तर बाकीचे ५ नट पडून गेले होते. तसेच असलेले ३ नट सुद्धा हाताने फिरत होते. बसची अशी अवस्था असताना बस का बरं सोडण्यात आली होती.
हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. यामध्ये चालकाचा सुद्धा हलगर्जीपणा दिसून येत आहे. बस मुबईकडून श्रीवर्धनकडे येताना पनवेल, पेण तसेच इतर पुढील स्थानकांत थांबली होती. यावेळी चालकांनी याकडे लक्ष दिले नाही का? दिले असेल तर याची कल्पना संबंधित विभागाकडे दिली होती का याची नोंद करण्यात आली आहे का? ही बस श्रीवर्धनकडे येताना वेडी-वाकडी वळणे, चढ-उतार घेत येते.
याठिकाणी एक्सल बाहेर पडला असता तर चालकाला बस नियंत्रणात आणणे शक्य झाले असते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनुचित घटना घडली नाही म्हणून विषय सोडून देण्यापेक्षा प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई सुद्धा झाली पाहिजे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.