Monday, June 30, 2025

राज ठाकरेंची मोठी घोषणा: ५ तारखेला मोर्चा नाही, आता होणार 'विजयी मेळावा'!

राज ठाकरेंची मोठी घोषणा: ५ तारखेला मोर्चा नाही, आता होणार 'विजयी मेळावा'!

मुंबई: मराठी माणसाच्या एकजुटीचा मोठा विजय झाला. इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने लादण्याचा सरकारचा प्रयत्न मराठी एकजुटीने हाणून पाडला, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत जाहीर केले. या विजयामुळे येत्या ५ तारखेला नियोजित असलेला मोर्चा आता निघणार नाही, त्याऐवजी विजयी मेळावा होणार आहे, असे ते म्हणाले.


हिंदी सक्तीचा अध्यादेश मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे आणि त्याबद्दल तमाम मराठी जनांचं मनापासून अभिनंदन. ५ तारखेचा हा मेळावा कोणत्याही पक्षाचा झेंडा नसलेला, फक्त मराठी माणसाचा मेळावा असेल." या विजयी मेळाव्याचे तपशील लवकरच जाहीर केले जातील, असंही त्यांनी सांगितलं.



श्रेयवादाचा विषय नाही, पण मराठी एकवटली!


राज ठाकरे पुढे म्हणाले, "हा काही श्रेयवादाचा विषय नाही. पण जेव्हा हा विषय समोर आला, तेव्हा आम्ही त्याला तीव्र विरोध केला." त्यांनी यापूर्वी पाठवलेली तिन्ही पत्रं वाचून दाखवली आणि सांगितलं की, "आम्हाला उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस यांनीही पाठिंबा दिला. ५ तारखेला जर हा मोर्चा निघाला असता, तर तो 'न भूतो न भविष्यती' असा झाला असता, संयुक्त महाराष्ट्राच्या काळाची आठवण झाली असती आणि सरकारला मराठी माणसाची ताकद कळाली असती."



संजय राऊतांचा फोन आणि 'बिगर-पक्षीय' मेळाव्याची कल्पना


काल रात्री संजय राऊत यांचा फोन आल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. "मोर्चा रद्द करावा लागेल असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा त्यांनी विजयी मेळावा घेण्याची कल्पना मांडली आणि ५ तारखेलाच घेण्याबद्दल विचारलं. मी 'घ्या' म्हणालो, पण ठिकाणं ठरवू नका असंही बजावलं. सहकाऱ्यांशी बोलून मेळावा घेऊ. त्यांनीही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलून निर्णय घ्यावा, पण या मेळाव्याला कोणतंही पक्षीय लेबल लावू नका," असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. वर्तमानपत्रे आणि चॅनलने हा विषय लावून धरल्याबद्दल त्यांनी त्यांचेही आभार मानले.



'ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून निर्णय रद्द?' या प्रश्नावर राज ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर!


ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय रद्द केला का, असा प्रश्न विचारल्यावर राज ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, "मोर्चाला किंवा विजयी मेळाव्याला तुम्ही पक्षीय लेबल लावू नका. युती-आघाडी, निवडणुका येत-जात राहतील, पण मराठी भाषा संपली तर ती परत येणार नाही. भाषा संस्कृती टिकवते. तीच मुळाशी गेली तर युती-आघाडीला काय अर्थ आहे? या गोष्टीकडे राजकीय लेबल न लावता, एक संकट म्हणून पाहिलं पाहिजे."


यावेळी त्यांनी अजित पवारांनीही हिंदी सक्तीला विरोध केल्याची आठवण करून दिली. ५ तारखेच्या मेळाव्याचा निर्णय लवकरच कळवला जाईल आणि कोणताही अजेंडा नसणार हे त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा