मुंबई (प्रतिनिधी): मुळशी तालुक्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या ढिसाळ कार्यामुळे राजकीय पक्षाशी संबंधित प्रकरणांकडे डोळेझाक करण्याच्या कार्यपद्धतीमुळे टीकेचा धनी बनलेल्या राज्य महिला आयोगाला अखेर जाग आली आहे. आयोगातील रिक्त १७ पदांवर कर्मचारी भरती करण्यात आली आहे.
आयोगाकडे वर्षाला नऊ हजारांच्या आसपास महिलांच्या तक्रारी येतात. मात्र त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आयोगाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. आयोगाची चार सदस्य पदे रिक्त आहेत. आयोगाला एकुण ३५ पदांची मंजुरी आहे. पैकी १८ पदांवर कर्मचारी कार्यरत होते, मात्र १७पदे रिक्त होती. सर्व रिक्त पदांवर बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.