
नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
‘प्रेमगीत’ हा सुदेश इशार यांनी दिग्दर्शित केलेला १९८१ सालचा सिनेमा. त्याची कथा होती शशी भूषण यांची आणि प्रमुख कलाकार होते राज बब्बर (आकाश भारद्वाज ऊर्फ कवी निशांत) आणि अनिता राज खुराना (शिखा). अनिता राजचा हा पहिला सिनेमा. तिने नंतर ‘मेहेंदी रंग लायेगी’(१९८२), ‘दुल्हा बिकता हैं’(१९८२), ‘जरासी जिंदगी’, ‘प्रेम तपस्या’, ‘नौकर बीवीका’, ‘अच्छा बुरा’, ‘जीत हमारी’, ‘थाई विदु’ (‘जीत हमारी’चा तामिळ रिमेक), असे ८० च्या आसपास सिनेमा केले.
तिने १९८६ पासून टीव्हीवरही अनेक भूमिका केल्या. सध्याही ती ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’मध्ये काम करते आहे. ‘प्रेमगीत’ मध्ये राजबब्बर आणि अनिताबरोबर मदन पुरी, रजनी शर्मा, सोकर जानकी, शशी रंजन, विजू खोटे, शम्मी (कपूर नाही.), कोमल सोनी, गुलशन ग्रोवर असे अनेक कलाकार होते.
या सिनेमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेकदा खलनायकाच्या भूमिका केलेला राज बब्बर प्रेमगीतमध्ये रोमँटिक नायक होता. तसेच फक्त खलनायकी भूमिकाच केलेले मदनपुरी प्रेमगीतमध्ये एका प्रेमळ पित्याच्या भूमिकेत होते.
आकाश मित्रात लोकप्रिय आहे. ते सगळे ट्रीपला म्हणून शिमल्याला जातात. तिथे हॉटेलमध्ये त्यांची भेट नृत्यांगना शिखाशी होते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. आकाश हाच आपला आवडता कवी निशांत आहे हे माहीत नसल्याने तो जेव्हा ओळख करून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा शिखा त्याचा अपमान करते; परंतु पुढे ओळख पटल्यावर त्यांचे प्रेम फुलते. आकाशचे वडील (मदन पुरी) या लग्नाच्या विरुद्ध असतात. आकाश जेव्हा त्यांना सांगतो की, शिखाला ब्रेन ट्युमर आहे आणि तिच्या हातात केवळ ६ महिनेच आहेत. तेव्हा सगळे चित्र पालटते. पूर्ण कुटुंबच तिची अतिशय प्रेमाने काळजी घेऊ लागते. आकाश तिच्याशी लग्नालाही अनुमती मिळवतो.
शिखाला आपल्या असाध्य रोगाबद्दल माहिती नसते. नंतर सगळेच सर्वांना माहीत होते. दुसऱ्याला दु:ख होऊन नये म्हणून सगळेच हे नकोसे सत्य एकमेकांपासून लपवतात. शिखाही तेच करते.
एक असह्य दु:ख मूकपणे सहन करताना प्रिय व्यक्तीवर तिच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत प्रेमाचा वर्षाव करण्याची सर्वांची धडपड पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणावतात. अस्सल अभिनयाचे अनेक क्षण आणि शशीभूषण यांचे संवाद केवळ अप्रतिम आहेत.
दुर्दैवाने प्रेमगीत ही एक शोकांतिका होती आणि सिनेमात मोठी नावे नसल्याने उत्तम कथा, उत्तम अभिनय, उत्तम संगीत असूनही सिनेमाला हवी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. काहींच्या मते प्रेमगीतच्या पूर्वी राज बब्बरने ‘इन्साफ का तराजू’मध्ये केलेल्या नकारात्मक भूमिकेमुळे असे झाले असावे. मात्र १९८० च्या दशकातील रोमँटिक सिनेमांच्या मालिकेत प्रेमगीतचे स्थान एक क्लासिक चित्रपट असेच आहे.
हसरत जयपुरींचे एक गाणे आजही लोकप्रिय आहे. जगजीतजींचे कर्णमधुर संगीत गाण्यानंतरही कानात घुमत राहते. गाण्याचे शब्द होते -
‘होंठोंसे छू लो तुम,
मेरा गीत अमर कर दो.
बन जाओ मीत मेरे,
मेरी प्रीत अमर कर दो.’
निशांत कवी आहे तर शिखा नृत्यांगना. ती त्याच्या कवितांची चाहती आहे. मात्र तिला आकाशच ‘निशांत’ आहे हे माहीत नाही. तो मात्र तिला कळकळीने विनवतो आहे, ‘प्रिये, तू माझी कविता गाशील? तुझ्या ओठांच्या अमृतस्पर्शाने ती अमर होईल. तू माझ्या प्रेमाचा स्वीकार केलास तर तेही अमर होईल.’
आजपासून ४४ वर्षांपूर्वी कर्करोग असाध्य मानला जाई. त्याचे निदान म्हणजे मृत्यूचे बोलावणे असेच मानले जाई आणि तेव्हा ती वस्तुस्थिती होती. त्यामुळे पुढच्या ओळी येतात -
‘ना उम्रकी सीमा हो,
ना जन्मका हो बंधन.
जब प्यार करे कोई,
तो देखे केवल मन.
नयी रीत चलाकर तुम,
ये रीत अमर कर दो.’
प्रिये, आयुष्याची मर्यादा प्रेमाला नसते. आयुष्य संपल्यावरही शिल्लक राहिले तरच ते खरे प्रेम. शरीर तर नष्ट होणारच आहे. त्यामुळे आयुष्य, शरीर, त्याचे सौंदर्य हे बघून प्रेम करण्यात काय अर्थ? महत्त्वाचे आहे ते मन आणि त्यातले अदृश्य प्रेम! तुही माझ्याप्रमाणे हे स्वीकार. आपण शरीरापेक्षा मनाला महत्व देण्याचा रिवाज प्रेमाच्या साम्राज्यात आपण रूढ करू. मला
तुझी साथ दे.
प्रियतमेचे प्रेम न मिळाल्याने त्याला जीवन व्यर्थ वाटते आहे. तो म्हणतो, आकाश जसे पोकळ, मोकळे, रिते असते तसे माझे मन तुझ्या अनुपस्थितीने एकाकी आहे. तू पायातले पैंजण वाजवत माझ्या आयुष्यात ये ना. तुझ्या येण्याने माझी कविता, माझे संगीत चिरंजीवी होईल.
‘आकाशका सूनापन,
मेरे तनहा मनमें,
पायल छनकाती तुम,
आ जाओ जीवनमें.
सांसें देकर अपनी,
संगीत अमर कर दो.’
शिखाला आपल्या जीवनातील तिचे महत्त्व पटावे म्हणून आकाश अनेक प्रकारे तिला विनवतो. तो म्हणतो मला कुणीही आवडले की नियती माझ्याशी क्रूर खेळ खेळते आणि ती व्यक्ती माझ्या जीवनातून निघून जाते. मी आजवर सगळीकडे हरत आलो आहे. पण निदान यावेळी तरी तू हे टाळू शकतेस. तुझे हृदय हरून तूच मला जिंकल्याचे सुख देऊ शकशील. कृपाकरून माझे प्रेम स्वीकारून त्याला अमरत्व दे ना.
‘जगने छीना मुझसे,
मुझे जो भी लगा प्यारा.
सब जीता किये मुझसे,
मैं हरदमही हारा.
तुम हारके दिल अपना,
मेरी जीत अमर कर दो.’
‘अखियोंके झरोकोंसे’ ‘मिली, ‘आनंद’, ‘सफर’ ‘प्रेमगीत’ ‘एक दुजेके लिये’ या सगळ्या शोकांतिका आहेत. आजच्या जगात कुणालाच दु:ख अनुभवणे तर काय पाहणेही नको आहे. आयुष्य केवळ चंगळ, धमाल करत भोगायचे असते हा समज मनामनात बिंबवण्यात मनोरंजन विश्वाला प्रचंड यश आले आहे. त्यामुळे लोक फक्त धमाल, धूम, विनोद पाहण्यातच मनोरंजन आहे असे मानतात. मराठीत तर विनोदी चित्रपटांना, हास्य-मालिकांना सर्वांत जास्त पसंती मिळते; परंतु मास कम्युनिकेशनच्या ज्या अनेक थियरी आहेत त्यात एक ‘थियरी ऑफ कॅथार्सिस’ म्हणून ओळखली जाते. तिच्यानुसार जर सिनेमा नाटक, कादंबरी यात दु:ख, संघर्ष, शोकांतिका पाहिल्या तर मनातील भावभावनांचे विनासायास विरेचन होते. त्या त्या पात्रांची दु:खे, आनंद, चिंता, अनुभवताना आपल्याही भावना मोकळ्या होऊन मन स्वच्छ होते, त्याची कुंठीत अवस्था संपून ते प्रवाही होते. म्हणून अशा कलाकृतीचाही आस्वाद अवश्य घेतला पाहिजे. मनाच्या निकोप, समतोल वाढीसाठी सुखांतिकाबरोबर शोकांतिकांचेही वेगळे महत्त्व आहे. यावर हरी नारायण आपटे १८९० सालीच म्हणून गेले आहेत, ‘पण लक्षात कोण घेतो?’