विशेष : डॉ. विजया वाड
उदयाचल प्यारा, हमारा उदयाचल!
जितना प्यारा, उतना प्यारा
माता का आंचल!
उदयाचल हायस्कूल गोदरेज विक्रोळी येथे मी २७ वर्षे सलग नोकरी केली. रोज आठ तास दहा मिनिटे शाळा चाले. याच शाळेत माझ्या दोघी मुली शिकल्या. पाचवी ते दहावी प्राजक्ताच्या वर्गात एक मुलगा होता. त्याला वाटे प्राजक्ता ही वाड टीचरची मुलगी असल्याने तिला पेपर कळतात आधीच! मग पहिली येईल नाही तर काय? नवल कसले त्यात? मग तो त्याचे आवडते वाक्य बोले, “बोर्ड मे दिखाएगा !” असे दहावीपर्यंत चाललेलं.
बोर्डाची परीक्षा आली. प्रत्येक विद्यार्थ्यांने झटून अभ्यास केला होता. बोर्डाची परीक्षा ताईने-प्राजक्ताने मुलुंडला दिली. कारण त्यावेळी आम्ही मुलुंडला राहत होतो. मुलुंडच्या सेंटरवर आईने नाव नोंदवले.
“अभी देख!” तो मुलगा बढाई मारत म्हणाला. ताई नित्य अभ्यास करीत होती. इतका नियमित की गणिताच्या पेपर आधी मला म्हणाली,
“आई, आता मी शांत झोपते. मला सर्व गणिते येत आहेत. खरं तर, गणित उभे - आडवे पाठ आहे.”
“झोप बरं ताई. माझ्या कुशीत झोप.”
“आईच्या कुशीत माझं पिल्लू शांत झोपलं.
निशू मात्र जागत होती. तिचा अभ्यास शेवटच्या मिनिटापर्यंत चालूच असे. अगदी परीक्षेच्या हॉलमध्ये सुद्धा, निरीक्षक पेपर हिसकावून घेईपर्यंत पुस्तक वाचन
चालूच असे.
दोघी मुलींमध्ये असा अामूलाग्र बदल होता. निशू त्यावेळी नाटकातून कामे करीत होती. चंद्रलेखा, अमोल पालेकर यांची नाटके! प्रेमाच्या गावा जावे, सुधीर भटांचे ‘मोरुची मावशी’ (या नाटकाचे ४०० दिवसांत ४०० प्रयोग झाले.) शाळा अॅडजेस्ट करे हे विशेष!
तर प्राजक्ता! बोर्डाची परीक्षा तिने इमाने इतबारे दिली. “अब आएगा मजा!”
तो मुलगा म्हणाला, पण बोर्डाचा निकाल प्राजक्ताच्या बाजूने लागला. तो मुलगा दुसरा आला. माझी पोर विक्रोळीतून पहिली आली! बोर्ड में पेपर दिखाते क्या रे?’ तो मित्र राष्ट्राला विचारीत राहिला.
बारावीला प्राजक्ताला तोडफोड गुण मिळाले. ९९ टक्के! गणित, विज्ञान दोन्हीत ९९ टक्के गुण. ती बोर्डात तिसरी आली. त्यालाही उत्तम गुण मिळाले होते, पण प्राजक्ताची वरकड कायम राहिली. पुढे दोघे केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. विद्यार्थीदशा लांबच लांब! दोघे एम. एस. झाले. उच्च गुणांनी, वरचा नंबर प्राप्त करीत!
एव्हाना प्राजक्ता प्रेमात पडली होती. अभिजित देशपांडे असे त्या देखण्या युवकाचे नाव होते. त्याच्याशी पुढे तिने लग्न केले. अभिजित एम. डी. झाला होता. तिला तीन वर्षे सीनियर होता. निशिगंधा बापू भेंडे (आत्माराम भेंडे) यांच्या आव्हान मालिकेमुळे महाराष्ट्राचा हार्ट थ्रॉब झाली होती.
खूप प्रसिद्धी! एकच दूरदर्शन वाहिनी असल्याने मिळाली होती.
त्यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर होती निशिगंधा वाड !
एव्हाना ‘उदयाचल प्यारा हमारा उदयाचल’ सोडून मी पोदार विद्यासंकुलात प्राचार्यपदी रुजू झाले होते. मजसाठी तो सुवर्णकाळ होता. अशावेळी उदयाचलात माझा निरोप समारंभ जरा उशिराने का होईना आयोजित केला गेला. सोयीसवडीने, सहा महिन्यांनी, इतर अनेक शिक्षक निवृत्त होण्याच्या वेळी.
“मला नाही यायचे. हा कसला निरोप समारंभ.”
“ऐक माझे आई, राग मनी धरू नकोस.” माझी प्राजू म्हणाली.
“सोडून द्यायला शीक.” ती माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली.
“सोडून दे राग ! जीवन सोये कर !” माझी तरुण प्यारी मुलगी मला समजावीत होती.
मी गेले. राग विसरून गेले. माझी भाषणाची वेळ आली तेव्हा तो मुलगा (आता तो डॉक्टरीला गेला होता.) उठून उभा राहिला. “ टीचर, उदयाचल गीत गा !” त्याने आग्रह केला..
पिनकिन त्रिवेदी यांनी रचलेले ते अमर गीत...
जितना प्यारा, उतना प्यारा, माता का आचल
जगमग ज्ञान का सूरज चमके, ज्योति जगे निर्मल !
प्यारा हमारा उदयाचल !
आम्ही सारे गायलो. एका स्वरांत उच्चरवात अभिमानाने !
गर्वाने ! शाळा हे अजब प्रेमाचे रसायन आहे खरेच!