
नवी मुंबई : स्वच्छ मुंबई शुद्ध मुंबई या संकल्पनेतून नवी मुंबईकरांनी सायन - पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहिम राबवली, या मोहिमेत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्यावतीने ३५०० हून अधिक श्रीसदस्यांनी सहभाग घेतला. ही आनंदाची बाब असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली. तसेच नवी मुंबईतील बेलापूर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी या पाच रेल्वे स्टेेशनची स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये २२ टन कचरा संकलित करण्यात आला. तसेच प्लास्टिकचे तुकडे, रॅपर्स, एकल वापर प्लास्टिक, बॉटल्स, कागद, कपडा अशा प्रकारचा कचरा तसेच अस्ताव्यस्त वाढलेले गवत, वेली यांचाही हरित कचरा संकलित करण्यात आला.
उरण फाटा येथे आयुक्तांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेऊन, स्वच्छता करण्यास सुरवात करण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी श्रीसदस्यांनी उपस्थिती दाखवत स्वच्छता कामाविषयी तत्परता दाखवली. यावेळी तिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ १ उपआयुक्त डॉ.अजय गडदे व परिमंडळ २ उपआयुक्त श्रीम.स्मिता काळे, परिमंडळ १ उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त डॉ.अमोल पालवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
केंद्र सरकारमार्फत ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत १ जुलैपासून ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ हे अभियान संपूर्ण देशभरात राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेने त्याची सुरूवात आधीपासूनच जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमातून केली असून आजचाही उपक्रम त्याच अभियानाचा भाग असल्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले. स्वच्छता आणि आरोग्य या दोन्ही परस्परपूरक गोष्टी असल्याने तसेच पावसाळी कालावधीत किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याचे उच्चाटण करण्यासाठी ही स्वच्छता मोहीम राबविली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
सायन पनवेल महामार्ग नवी मुंबईहून जाणारा अत्यंत महत्वाचा आणि वर्दळीचा रस्ता असून तो महानगरपालिकेच्या अखत्यारित येत नाही तरीही त्याठिकाणी स्वच्छता करणे गरजेचे असल्याची बाब लक्षात आली. त्यामुळे महानगरपालिकेने स्वत:हून पुढाकर घेऊन तेथे नियमीतपणे स्वच्छता मोहीम आयोजित करीत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. रविवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी स्वच्छता मोहीमेत व्यापक लोकसहभाग लाभेल या भूमिकेतून आज आयोजित करण्यात आलेल्या सायन पनवेल महामार्ग व रेल्वे स्टेशन्स सखोल स्वच्छता मोहीमेत पद्मश्री, महाराष्ट्रभूषण डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छताविषयक जाणीवेने प्रेरित झालेल्या 3500 हून अधिक श्रीसदस्य नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.