Tuesday, July 1, 2025

वर्षा ऋतू वातदोष आणि बस्ती चिकित्सा

वर्षा ऋतू वातदोष आणि बस्ती चिकित्सा

पासंगिक वैद्य : सुप्रिया भिडे


आयुर्वेदात सहा ऋतूंचे वर्णन केले आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. वर्षा ऋतु म्हणजे पावसाळा. (जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे महिने) ग्रीष्म ऋतूत शरीरात संचित झालेल्या वाताचा वर्षा ऋतूमध्ये येणारे ढग, पाऊस, शीत वायू यामुळे प्रकोप होतो. वर्षा ऋतूत जल हे स्वभावत:च आम्लविपाकी होते. परिणामतः शरीरातील अग्नीच बल कमी होतं आणि त्यामुळे अग्नि मंद होतो.


रोगा:सर्वेsपि मंदाग्नौ :


सर्व आजार हे शरीरातील अग्नि मंद झाल्यामुळे होतात.
वर्षा ऋतूत अग्नि मंद झाल्याने आम्लपित्त, अजीर्ण, अतिसार (loose motions), पोटदुखी यासारखे आजार होतात. पावसाळ्यात वातावरणात वाढलेल्या गारठ्याने वातदोषाचा प्रकोप होतो. वात हा स्वभावतः शीत (थंड)आणि रुक्ष (ड्राय) गुणाचा आहे. म्हणून त्याला कमी करण्यासाठी उष्ण आणि स्निग्ध अशा गुणांनी युक्त तेलाच्या बस्तीचा उपयोग होतो.


वर्षा ऋतूत होणारे आजार :
अजीर्ण, अपचन, पोट फुगणे, ढेकर येणे, भूक मंदावणे, कंबर दुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी, शीतपित्त (अंगावर गांधी उठणे), दमा, एक्झिमा,
अम्लपित्त, पोटदुखी, अतिसार(loose motions) इत्यादी.


बस्ती म्हणजे काय?
बस्ती म्हणजे सर्वसामान्य भाषेमध्ये एनिमा. पंचकर्मांपैकी एक महत्त्वाचे गणले जाणारे हे कर्म आहे. यात औषधी तेल, काढा अथवा दूध गुदद्वारातून (मोशनच्या ठिकाणातून) रबरी ट्यूब (rubber catheter)द्वारे आतड्यात सोडले जाते. आयुर्वेदानुसार वातदोषाचे स्थान पक्वाशय (आतडी)आहे आणि बस्तीचे काम एक्झॅक्टली त्याच ठिकाणी होते. त्यामुळे वात कमी होऊन पावसाळ्यात होणाऱ्या विविध आजारांमध्ये बस्तीचा फायदा दिसतो.


बस्तीचे फायदे :
१) वातदोष कमी होतो.
२) शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात (detoxification ) त्यामुळे शरीराची शुद्धी होते.
३)पचनक्रिया सुधारते.
४)वाताचे विकार जसे सांधेदुखी, कंबर दुखी, आमवात, गुढघे दुखी इत्यादी कमी होतात.
५) शरीरधातूंचे पोषण आणि वर्धन होते.
६)अपचन, मलबद्धता, पोटात वात होणे (bloating) भूक न लागणे, वारंवार ढेकर येणे अशा तक्रारी दूर होतात.
७) पाळीच्या सर्व तक्रारीत उपयोग होतो.
८) पुढे येणाऱ्या शरद आणि हेमंत ऋतुसाठी शरीराची तयारी होते.


आयुर्वेद हे केवळ व्याधी उपचाराचे शास्त्र नाही, तर ते जीवन जगण्याचे शास्त्र आहे. म्हणूनच वर्षा ऋतूत आजारी व्यक्तीने तर बस्ती घ्यावाच पण निरोगी व्यक्तीने सुद्धा आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून बस्ती घ्यावा, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

Comments
Add Comment