
रोजगार संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार
अलिबाग : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत महाराष्ट्र सरकारच्या विविध उद्योगांबरोबर झालेल्या करारांतून मोठे उद्योग राज्यात येत आहेत. त्यायोगे मोठी गुंतवणूक होऊन रोजगार संधी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यात या माध्यमातून २१ हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीचे नवीन प्रकल्प येत आहेत.
रायगड जिल्ह्यात या अंतर्गत होणाऱ्या उद्योगांमध्ये पनवेल तालुक्यातील तळोजा येथे सुमारे १२ हजार कोटींचा सेमीकंडक्टर प्रकल्प, तळेगाव-भिवपुरी येथे आदिनी एनर्जी सोल्युशनचा १६६० कोटींचा ग्रीन पॉवर ट्रान्स्मिशन प्रोजेक्ट, तर दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र विस्ताराचा ७ हजार ३६० कोटींचा प्रकल्प हे प्रमुख प्रकल्प आहेत.
या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे ३ लाख थेट रोजगार व सुमारे ५ लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत. या निमित्ताने पनवेल, कर्जत आणि श्रीवर्धन तालुक्यांत विकासात्मक मोठे परिवर्तन घडून येणार आहे.दरम्यान, लवकरच सुरू होण्याच्या टप्प्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील विकासाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, विविध गृहनिर्माण प्रकल्पांसह पूरक (अन्सि-लरी) उद्य उद्योगांमध्ये वाढ होणार असल्याची माहिती शासकीय सुत्रांनी दिली आहे.