
अन्य रंगांच्या पत्रिका असल्यास त्वरीत बदलाव्या लागणार
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यरत कर्मचारी तथा अधिकारी यांची शिधापत्रिका शुभ्र असणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत कर्मचारी तथा अधिकाऱ्यांनी आपल्या शिधापत्रिका तथा पुरवठा पत्रिका या त्वरीत शुभ्र अर्थात पांढऱ्या रंगाच्या करून घ्याव्यात अशाप्रकारचे निर्देशच आता महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे शिधापत्रिका तथा पुरवठा पत्रिका मिळण्यासाठी खोटी माहिती देणे हा दखलपात्र गुन्हा असल्याने, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शुभ्र शिधा पत्रिका न केल्यास खोटी माहिती दिल्याच्या नावाखाली फौजदारी कारवाई केली जाईल, असाही इशारा दिला आहे.
"केंद्र अथवा राज्य शासनाच्या सेवेतील अथवा त्यांच्या अधिपत्याखालील निमशासकीय सेवेतील अधिकारी/ कर्मचारी यांनी जुनी शिधापत्रिका अथवा पूर्वीच्या शिधापत्रिकेतून नाव कमी केल्याचा दाखला देऊ शकत नसतील, तर त्यांच्याकडून ते काम करीत असलेल्या आस्थापनाचे प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड तसेच निवासासंबंधीचा पुरावा विचारात घेऊन त्यांना शुभ्र शिधापत्रिका देण्यात यावी, अशाप्रकारचा निर्णय जून २०१३ मध्ये घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने महापालिकेच्या सामान्य विभागाने आपल्या सर्व कार्यरत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आपल्या शिधापत्रिका शुभ्र करून घेण्याच्या सूचना केल्या असून त्यासंदर्भात सर्व खाते आणि विभागांच्या प्रमुखांना तसे निर्देशही देण्यात आले आहेत. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने २७ जून २०२५ रोजी एक परिपत्रक जारी करून सर्व खाते आणि विभाग प्रमुखांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना याबाबतचे आवाहन करत, महानगरपालिकेच्या सर्व कार्यरत कर्मचारी आणि अधिकारी यांनी त्यांच्याकडे शुभ्र शिधापत्रिका नसेल तर अशा कर्मचारी तसेच अधिकारी यांनी स्वतः संबंधित शिधावाटप कार्यालयाकडे संपर्क साधावा व शिधापत्रिका शुभ्र करुन घ्यावी, अशाप्रकारच्या सूचना केल्या आहेत.
खोटी माहिती असल्यास फौजदारी कारवाई होणार
ज्या शिधापत्रिकाधारकांनी स्वतःहून शिधापत्रिका बदलून अथवा जमा करून घेतल्या नाहीत, अशा अपात्र शिधापत्रिकाधारकां विरुद्ध यापुढे वेळोवेळी जेव्हा अशी परिस्थिती निदर्शनास येईल तेव्हा सार्वजनिक वितरण स्थायी आदेश, २००१ मधील कलम ३.७ नुसार तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ मधील तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहितेमधील कलम ४२०, २१७, ४१९, ४६७, ४७१ या कलमाखाली गुन्हे शिधापत्रिका तथा पुरवठा पत्रिका मिळण्यासाठी खोटी माहिती देणे हा दखलपात्र गुन्हा असून, खोटी माहिती देणाऱ्या विरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल,असेही म्हटले आहे.
नागरी पुरवठा कार्यालयाला खातरजमा करणे गरजेचे
महानगरपालिकेतील सर्व खाते/विभाग प्रमुख यांच्या अखत्यारितील आस्थापना प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कर्मचारी आणि अधिकारी यांची शिधापत्रिका शुभ्र असल्याबाबत खातरजमा करून ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शिधापत्रिका शुभ्र केलेल्या नसतील त्यांची नावे, पत्ता व तपशील नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या कार्यालयाला कळवावे, असेही निर्देश दिले आहेत.