
मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक व्यक्ती जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.
शनिवारी संध्याकाळी ६.१५ वाजता हे तीन व्यक्ती अस्थी विसर्जनासाठी वरळीच्या लोटस जेट्टीजवळ गेले होते.
पावसाळ्याच्या काळात समुद्र आधीच उसळलेला असतो. अस्थी विसर्जन करण्यासाठी ते समुद्राच्या खोल भागात गेले असता तिथे ते बुडाले.
यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी तत्काळ ओरडून मदत मागितली. जेट्टीवर तैनात असलेल्या पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने तिन्ही व्यक्तींना समुद्रातून बाहेर काढले आणि त्वरित नायर रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात दाखल करताना दोघांचा आधीच मृत्यू झाला होता. तिसरा व्यक्ती जखमी अवस्थेत आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या माहितीनुसार जखमी व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे.
मृत व्यक्तींची नावे:
संतोष विश्वेश्वर (वय ५१)
कुणाल कोकाटे (वय ४५)
जखमी व्यक्ती:
संजय सरवणकर (वय ५८)
या पावसाळ्यातील पहिली घटना
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, यावर्षीच्या पावसाळ्यात मुंबई समुद्रात बुडून होणारा हा पहिला मृत्यू आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही दुर्दैवी घटना घडली आहे.
मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचा इशारा दिला होता. पावसाळ्यात समुद्रातील लाटा धोकादायक असतात आणि अपघाताची शक्यता वाढते, असे सांगितले होते.