Friday, June 27, 2025

लुप्त झालेला नाट्य खजिना : भांगवाडी थिएटर

लुप्त झालेला नाट्य खजिना :  भांगवाडी थिएटर

भालचंद्र कुबल : पाचवा वेद


सध्या राजकीय वारे शिक्षणाच्या दिशेने वाहणाऱ्या हिंदी भाषेच्या झग्यात शिरलेत. त्यामुळे इतकी वर्षे मुंबई, पुणे, नागपूर तसेच छ. संभाजी नगर, नाशिक, कोल्हापूरसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात मनोरंजनाच्या माध्यमातून ठाण मांडून बसलेली हिंदी भाषा महाराष्ट्रातून हद्दपार केली जाईल, हा कल्पना विलास ठरेल यात शंका नाही. मुळात हिंदीची सक्ती नको हे म्हणणे जेवढे सोपे आहे तेवढाच त्या भाषेने आपल्या रोजच्या जगण्याला घातलेला वेढा आपली शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि वैचारीक उपासमार करू शकतो, हे सत्य नाकारता येणारच नाही; परंतु ती वेळ मात्र आता निघून गेलीय. हिंदी भाषा आपल्या आयुष्याचे अंग बनली तिच मुळी विविध रंगमाध्यमांमुळे. सिनेमा, टीव्ही मालिका, नाटके आणि समाज माध्यमे देत असलेला कंटेंट स्थानिक (मराठी) भाषेपेक्षा उजवा, प्रगल्भ आणि दर्जेदार निर्मिला जात असल्याने हिंदीचा वरचष्मा स्वीकारावाच लागेल. बंम्बैय्या बोली हा नवा भाषिक प्रकार जन्माला यायला तुम्ही आम्ही सर्वच जबाबदार आहोत. आज परिस्थिती अशी आहे की, याच बंम्बैय्या बोलीत येऊ घातलेल्या पिढीने नाटके लिहायला आणि सादर करायलाही सुरुवात केलीय. ती राष्ट्रभाषा नक्कीच नाही; परंतु कम्युनिकेट करणारी भाषा म्हणून मुंबईकरांना या भाषेव्यतिरिक्त पर्याय नाही आणि याच कारणांमुळे मुंबई आणि अखिल महाराष्ट्रात व्यवसाय म्हणून चालवल्या जाणाऱ्या हिंदी नाटकांना मोठी मागणी आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये किमान दोन प्रयोगांसाठी हिंदी भाषा प्रेक्षक पुरवू शकते, एवढा मोठा प्रेक्षकवर्ग हिंदी भाषेने नक्कीच निर्माण केलाय. विदर्भ मराठवाड्यात तर ठरावीक शहरे तर हिंदी भाषिक म्हणूनच ओळखली जातात. त्यामुळे तिथे हिंदी नाटके चालतातच…!


त्या खालोखाल विचार करण्यास भाग पाडणारी गुजराती नाटके...! महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसोबतच जी इतर भाषिक नाटके देखील सादर केली जातात त्यामध्ये प्रामुख्याने हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि उर्दू भाषेतील नाटकांचा समावेश होतो. खरं तर मुंबई आणि महाराष्ट्रात चालणाऱ्या अन्य भाषिक नाटकांचा आढावा त्यांच्याशी निगडीत असलेल्या थिएटर्सच्या माध्यमातून घ्यावा म्हणून ही लेखमाला घेऊन येतोय…!


भांगवाडी ही मुंबईच्या काळबादेवी विभागातली एक वाडी. तेथे पूर्वी आसपास भांग विकणारी दुकाने होती म्हणून त्या भागाचे नाव भांगवाडी. अशा ठिकाणी गुजराती संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ १८७४ मध्ये रोवली गेली. तेथे गुजराती नाटके १९६८ पर्यंत होत होती. एका विशिष्ट पद्धतीची नाटके तेथे होत असत त्यामुळे त्या पद्धतीच्या नाटकांना भांगवाडी थिएटर म्हटले जाऊ लागले. अजूनही गुजराती नाटकांच्या सादरीकरणावर या पद्धतीचा काहीसा प्रभाव आहे.


मुंबईच्या काही गजबजलेल्या रस्त्यांनी, बाजारांनी, जुन्या चाळींनी आणि माणसांनी तिचा सोनेरी इतिहास जपून ठेवला आहे. झपाट्याने बदलणाऱ्या मुंबई शहरात जुन्या वास्तू, मुंबईची गोष्ट सांगत उभ्या आहेत. अशाच एका सुवर्णकाळ पाहिलेल्या वास्तूची ही गोष्ट आहे. ती वास्तू म्हणजे ‘भांगवाडी थिएटर’! मुंबईच्या काळबादेवीमध्ये असलेल्या या थिएटरला गुजराती रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. भव्य-दिव्य नेपथ्य, नटांचे खणखणीत आवाजातील संवाद, गाणी आणि प्रेक्षकांचा वन्स मोअर! मनोज शहा हे गेली अनेक वर्षे गुजराती रंगभूमीवर कार्यरत आहेत. त्यांनी नव्वदपेक्षा जास्त नाटकांचे दिग्दर्शन केलेले आहे. ते ‘आयडियाज अनलिमिटेड’ या नाट्यसंचाद्वारे नाटकांची निर्मितीही करतात. त्यांनी ‘अपूर्व अवसर’, ‘मोहन नो मसालो’, ‘डॉ. आनंदीबाई जोशी : लाईक, कमेंट, शेअर’, ‘कार्ल मार्क्स इन काळबादेवी’ ही दिग्दर्शित केलेली काही नाटके आहेत. त्यांचे पहिले नाटक ‘मास्टर फुलमणी’ हे सतीश आळेकर यांच्या ‘बेगम बर्वे’ या नाटकाचे रूपांतर आहे. त्या नाटकात मनोज शहा यांनी भांगवाडी परंपरेची शैली वापरून जुना काळ उभा केला होता. भांगवाडीमध्ये पौराणिक, सामाजिक, राजकीय अशी वेगवेगळ्या प्रकारची नाटकं व्हायची. नातेसंबंधांवर आधारित कौटुंबिक नाटकंदेखील व्हायची. ‘वडिलोना वाके’, ‘मालौपती’, ‘हंसाकुमारी’, ‘सूर्यकुमारी’, ‘अहिल्याबाई’, ‘अरुणोदय’, ‘सिराज उद्दौला’, ‘विधी ना खेल’ ही काही नाटकांची नावे आहेत.
त्या काळात ब्रिटिशांनी लोकांवर बंधने आणली होती. तेव्हा लोक डोक्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या घालायचे. एका नाटकात असे दाखवले होते की, एक पात्र आपल्या डोक्यावरची टोपी काढून खाली फेकते आणि खिशातली गांधी टोपी डोक्यावर घालते, तर प्रेक्षकही त्यांच्या टोप्या फेकायचे आणि त्यांना दिलेल्या गांधी टोप्या घालायचे. अशी क्रांतिकारी कृतीच्या आठवणी भांगवाडी थिएटरशी निगडीत आहेत.


विषयानुसार तीन, चार किंवा पाच अंक असायचे. दोन अंकी नाटक नसायचे. पहिला अंक सुरू व्हायच्या आधी कलाकार स्तुती(नांदी) गायचे. वेळेचे काही बंधन नव्हते. स्त्री वेशातील लहान मुले हातात फुलांच्या माळा घेऊन प्रेक्षकांचे स्वागत करण्यासाठी रांगेत उभी राहायची. नाटक सुरू व्हायला अर्धा तास जायचा. या सगळ्यात आताच्या स्टँडअपप्रमाणे काही कलाकार बंद पडद्यासमोर येऊन कॉमिक सादर करायचे आणि लोकांना हसवायचे. ते नाटकाचा मूड सेट करायचे. अंक संपल्यानंतर मधल्या वेळेतही ते कलाकार येऊन कॉमिक सादर करायचे. त्याला ‘पडदा नो खेल’ असे म्हणत. स्टँडअपप्रमाणे त्यातले काही खेळ प्रसिद्ध होते. परंपरा अशी फिरून पुन्हा आपल्यासमोर येते. हे कॉमिक नाटकाच्या विषयाशी संबंधित नसायचे. भवाईप्रमाणे त्यात चालू घडामोडींवर बोलले जायचे.
पूर्वार्ध क्रमशः पुढील लेखात उत्तरार्ध….


(सदरातील अनेक संदर्भ थिंक महाराष्ट्र डॉट कॉम या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या तेजस्वी पाटील व तन्वी गुंड्ये यांनी गुजराती नाट्यकर्मी मनोजभाई शहा यांच्या मुलाखतीतील आहेत.)

Comments
Add Comment