Saturday, June 28, 2025

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद


नवी दिल्ली: हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) आपल्या ३ साथीदारांसोबत अ‍ॅक्सिओम-४ (Axiom-4) मिशनवर गेले आहेत. ते १४ दिवस अंतराळ स्थानकात राहणार आहेत. यादरम्यान त्यांनी अंतराळातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. ज्यात त्यांनी "अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अशी आपली भावना व्यक्त केली.    


पंतप्रधान मोदींनी शुभांशू शुक्ला यांच्याशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ एक्स वर देखील पोस्ट केला आहे आणि त्यासोबत लिहिले, "ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील त्यांचे अनुभव शेअर करताना माझी त्यांच्याशी खूप छान चर्चा झाली." पंतप्रधान म्हणाले की तुमच्या नावातच "शुभ" हा शब्द आहे आणि ग्रुप कॅप्टनचा अंतराळातील यशस्वी प्रवास हा एका नवीन युगाचा "शुभ-आरंभ" आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्ला यांना त्यांच्या आणि १.४ अब्ज भारतीयांच्या शुभेच्छा दिल्या. 



४० वर्षांत अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर


शुभांशू  शुक्ला इतर तीन अंतराळवीरांसह २५ जून रोजी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलद्वारे अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेअंतर्गत आयएसएससाठी रवाना झाले. शुभांशू  शुक्ला ४० वर्षांत अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीरही ठरले, तर राकेश शर्मा नंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल टाकणारे शुभांशू हे दुसरे भारतीय आहेत,  पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर दोघांमधील संभाषणाचा फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू  शुक्ला यांच्याशी संवाद साधताना दिसतात.





भारतासाठी त्यांची अ‍ॅक्सिओम-४ मोहीम अत्यंत अभिमानाची आणि महत्वाची ठरणारी आहे.  मात्र, शुभांशू अवकाशात पोहोचल्यानंतर तिथे कोणते काम करणार? काय खाणार? आणि कसा वेळ घालवणार? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभांशू शुक्लासोबत अलीकडेच झालेल्या संभाषणादरम्यान त्यांना विचारली आहेत. ज्याची उत्तरं देखील शुभांशु यांनी दिली आहेत.



शुक्ला अंतराळात काय खातील?


मोदींनी शुभांशू यांना अंतराळात कोणत्या प्रकारचे अन्न खाणार असा प्रश्न केला असता, त्यांनी एका खास प्रकारचे भारतीय जेवण खात असल्याच सांगितलं.   शुभांशु म्हणाले की त्यांनी या अन्नाच्या यादीत आंब्याचा रस, मूग डाळ हलवा आणि गाजर हलवा सोबत आणला आहे.



शुभांशु दिवसातून १६ वेळा सूर्योदय पाहतात 


पीएम मोदींशी झालेल्या संभाषणादरम्यान शुभांशु म्हणाले की सध्या मी ताशी २८००० किलोमीटर वेगाने फिरत आहे. आणि ते अंतराळात १६ वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहत आहेत.



अंतराळात पोहोचल्यावर मनात पहिला विचार कोणता होता?


मोदींनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना शुभांशू शुक्ला म्हणाले, की "जेव्हा मी अंतराळात पोहोचलो तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला की पृथ्वी एकसारखीच आहे. बाहेरून कोणतीही सीमारेषा दिसत नाही. अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो. पृथ्वी आपले घर आहे."



अवकाशात झोपणे हे सर्वात मोठे आव्हान


शुभांशू शुक्ला म्हणाले की अवकाशात सर्वकाही वेगळे आहे. आपण येथे येताच सर्व काही बदलले. छोट्या छोट्या गोष्टी बदलतात. सध्या मी माझे पाय बांधले आहेत. येथे झोपणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. मला विश्वास आहे की भारत खूप पुढे जात आहे. शुभांशू शुक्ला यांनी पुढे सांगितले की, आपले मन जितके शांत राहील तितक्या लवकर आपल्याला अनेक गोष्टी समजतील.



भारताच्या गगनयान मोहिमेच्या यशाचा हा पहिला अध्याय


शुभाशू शुक्लासोबत संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आज मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की हा भारताच्या गगनयान मोहिमेच्या यशाचा पहिला अध्याय आहे. तुमचा हा ऐतिहासिक प्रवास केवळ अवकाशापुरता मर्यादित नाही, तर तो विकसित भारताच्या आपल्या प्रवासाला वेगवान गती आणि नवीन बळ देईल." पंतप्रधान पुढे असे देखील म्हणाले की, "भारत आता जगासाठी अवकाशाच्या नवीन शक्यतांचे दरवाजे उघडणार आहे. आता भारत फक्त उड्डाण करणार नाही, तर भविष्यात नवीन उड्डाणांसाठी व्यासपीठ तयार करेल." पंतप्रधान मोदी यांनी शुभांशू यांचे कौतुक करताना म्हंटले, "शुभांशू, चांद्रयानाच्या यशानंतर देशातील मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये विज्ञानाबद्दल एक नवीन आवड निर्माण झाली, अवकाश शोधण्याची आवड वाढली. आता तुमचा हा ऐतिहासिक प्रवास त्या संकल्पाला अधिक बळ देत आहे. आज मुले फक्त आकाशाकडे पाहत नाहीत, त्यांना वाटते की मीही तिथे पोहोचू शकतो. ही विचारसरणी, ही भावना आपल्या भविष्यातील अंतराळ मोहिमांचा खरा पाया आहे. तुम्हाला पृथ्वी मातेची प्रदक्षिणा घालण्याचे भाग्य मिळाले आहे. यावेळी, आपण दोघेही बोलत आहोत, परंतु १४० कोटी भारतीयांच्या भावनाही माझ्यासोबत आहेत. माझ्या आवाजात सर्व भारतीयांचा उत्साह आहे. अंतराळात भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल मी तुला मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देतो."


Comments
Add Comment