अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर
मुंबई : अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाच्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा आता संपली असून, राज्यातील अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे ही यादी दिनांक ३० जूनला जाहीर होणार होती, पण शिक्षण संचालनालयाकडून ती आजच जाहीर करण्यात आली आहे.
जवळपास मागील दीड महिन्यापासून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अकरावी प्रवेशाची वाट पाहत होते. राज्यातील 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी यंदा अकरावीत कॉलेजसाठी (College) ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. दरम्यान, विद्यार्थी व पालकांना https://mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पाहता येणार आहे.
३० जून ते ७ जुलै दरम्यान कॉलेज प्रवेश निश्चित करायचा आहे
सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार ३० जून ते ७ जुलै दरम्यानच्या कालावधीत पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये नाव आलेल्या विद्यार्थ्यांना, कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करुन पारदर्शक व निकोप पध्दतीने प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी पहिली गुणवत्ता यादी आता 30 जून रोजी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आजच यादी जाहीर झाली असून 1 ते 7 जुलै दरम्यान मिळालेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा वेळ दिला आहे. दहावी बोर्ड परीक्षा निकाल जाहीर होऊन दीड महिना झाला अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत 12 लाख 71 हजार विद्यार्थी आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर जाऊन आपली गुणवत्ता यादी पाहून प्रवेशाचा निर्णय घ्यावा.