
उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. काल गुरुवारी लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने बसंतगडच्या बिहाली भागात जैश-ए-मोहम्मद (जेईएम)च्या ४ दहशतवाद्यांविरुद्ध शोधमोहीम राबवली, ज्यामध्ये एक दहशतवादी ठार झाला आहे. इतर तीन जैश दहशतवाद्यांना शोधण्यासाठी आणि ठार मारण्यासाठी आजही ही शोध मोहीम सुरू आहे. खराब हवामानामुळे बसंतगडच्या उंच भागात हे तिन्ही दहशतवादी लपले असल्याचे सांगितले जात आहे. महत्वाचे म्हणजे, बसंतगड हे कठुआ येथील आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात प्रवेश करणाऱ्या दहशतवाद्यांसाठी एक प्रसिद्ध घुसखोरी मार्ग आहे.
आज सकाळी बसंतगडमध्ये विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोध पथकाने शोध मोहीम सुरू केली तेव्हा गोळीबार सुरू झाला. घटनास्थळी अधिक सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. "सकाळी ८.३० च्या सुमारास दहशतवाद्यांचे ठिकाण समजले. तिथे चार दहशतवादी असल्याचा अंदाज आहे आणि आम्ही गेल्या एक वर्षापासून या दहशतवाद्यांवर लक्ष ठेवून होतो" असे जम्मू रेंजचे पोलिस महानिरीक्षक भीम सेन तुती यांनी माहिती दिली. धुक्याचे वातावरण असूनही शोध मोहीम सुरू आहे आणि हवामान सुधारल्यानंतर नेमक चित्र समोर येईल, असे ते पुढे म्हणाले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर दहशतवादी हे पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असून आणि लष्कराच्या पॅरा कमांडोंच्या नेतृत्वाखालील संयुक्त शोध पथकाला ते करूर नाल्याजवळ लपले असल्याची माहिती मिळाली. सकाळी जम्मूस्थित व्हाईट नाईट कॉर्प्स ऑफ आर्मीने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी बसंतगडच्या बिहाली भागात संयुक्त कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांशी संपर्क स्थापित झाला आहे. सध्या ही कारवाई सुरू आहे."
अमरनाथ यात्रा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर 'ऑपरेशन बिहाली'
काश्मीर हिमालयात वार्षिक अमरनाथ यात्रा सुरू होण्याच्या एक आठवडा आधी ऑपरेशन बिहाली असे सांकेतिक नाव असलेले हे ऑपरेशन करण्यात आले. याशिवाय, संशयास्पद हालचालींच्या वृत्तानंतर सुरक्षा दलांनी बुधवारी रात्री उशिरा सांबा जिल्ह्यातील पुरमंडल भागात शोध मोहीम राबवली. यादरम्यान झालेल्या चकमकीत पाकिस्तानचा हैदर उर्फ मौलवी म्हणून ओळखला जाणारा दहशतवादी ठार झाला. चकमकीदरम्यान लष्कराच्या पॅरा कमांडोंनी त्याला रोखले. उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.
अमरनाथ यात्रेच्या तयारीदरम्यान सुरक्षा वाढवली
पाकिस्तानी दहशतवादी गटांसाठी प्रमुख लक्ष्य राहिलेल्या अमरनाथ यात्रेपूर्वी सुरक्षा दलांनी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मॉक ड्रिल केले आहेत. २ जुलै रोजी जम्मूहून यात्रेकरूंचा पहिला गट रवाना होणार आहे. ३ जुलै रोजी वार्षिक अमरनाथ यात्रा सुरू होत असल्याने या प्रदेशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तुती म्हणाले की, यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी, आम्हाला केंद्राकडून अधिक निमलष्करी सेवा मिळाल्या असल्याचे सांगितले. त्यांनी यात्रेकरूंना जम्मूमधील यात्री निवास बेस कॅम्पमधून फक्त अधिकृत काफिल्यांसह प्रवास करण्याचादेखील यावेळी सल्ला दिला.
लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सच्या मते, दहशतवादी जंगली प्रदेशातून फिरत होते आणि लपण्यासाठी गुहांचा वापर करत होते. या गटाला अनेक महिन्यांपासून भूगर्भातील कामगारांनी (OGW) मदत केली होती. अन्न आणि निवारा देण्यासाठी त्यांना मदत केल्याबद्दल अलीकडेच किमान पाच OGWs ला अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, ज्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा माग काढला जात आहे त्यापैकी एक स्थानिक माणूस आहे जो पाकिस्तानहून परतला होता आणि आता तो घुसखोरांना मदत करत असल्याचे मानले जाते.
या प्रदेशात तणाव वाढल्यानंतर काही आठवड्यांनंतर ही चकमक झाली आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २६ लोक मारले गेले. यामुळे भारताने ६ मे रोजी दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ७ ते १० मे दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी होण्यापूर्वी एक छोटासा संघर्षदेखील झाला. त्यामुळे भारतीय सीमारेषेवर पाकिस्तानने पाळलेले दहशतवाद्यांची घुसखोरी आणि अतिरेकी हल्ले रोखण्यासाठी भारतीय लष्कर तैनात आहे.