
स्व. सुधीर फडके यांनी स्थापन केलेली सावरकर दर्शन प्रतिष्ठान ही संस्था स्वा. सावरकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करत. याचाच एक भाग म्हणून हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणलं जाणार आहे. सावरकरांचे विचार, साहित्य आजच्या पिढी पुढे आणणे हे सादरीकरणाच मुख्य उद्दिष्ट्य आहे. हे नाटक कालसुसंगत असल्याकारणाने याचे महाराष्ट्रभर १०० प्रयोग करण्याचा संस्थानाचा मानस आहे. सर्वसामान्यांना परवडतील असे ३०० /२००/१०० इतकेच तिकीटदर आकारण्यात येणार असल्याचं रवींद्र माधव साठे यांनी सांगितले. हे नाटक नव्या पिढीतील तरूण सादर करणार आहेत.
नाट्यसंपदा कला मंचाचे अनंत पणशीकर हे नाटकाचे सहनिर्माते असून मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार व दिग्दर्शक ऋषीकेश जोशी यांनी नाटकाची रंगावृत्ती आणि दिग्दर्शन केले आहे. या नाटकाला संगीतकार कौशल इनामदार यांच संगीत लाभलं आहे.सावरकरांचे भाषासौंदर्य आणि त्यांच्या लेखांतून दर्शवणारी भव्य दृकश्राव्यता मला कायम भुरळ घालते. हे नाटक त्याचं उत्तम उदाहरण आहे. व्यावसायिक गणित मांडताना आम्हाला सावरकर प्रतिष्ठानची खूप मदत झाली.असं या नाटकाचे सहनिर्माते अनंत पणशीकर म्हणाले.
हे नाटक म्हणजे ‘अहिंसेचे तत्वज्ञान’ आणि ‘राष्ट्रहित’ यातील द्वंद्व आहे.या नाटकात सांगितलेले अडीच हजार वर्षांपूर्वीचे विचार आजही तंतोतंत खरे ठरतात.तेच विचार, आदर्श या नाटकातून नवीन पिढीपर्यंत पोहचवण्याचा आमचा निर्धार असल्याचे दिग्दर्शक ऋषीकेश जोशी यांनी यावेळी सांगितले.
मयुरा रानडे, ओंकार कुलकर्णी, केतकी चैतन्य, ओमप्रकाश शिंदे आणि ऋषिकेश जोशी आदि कलाकारांचा या नाटकात समावेश आहे.भव्य आणि आकर्षक सेट्स, देखणी वेशभूषा, कलाकारांचा अभिनय आणि सावरकरांचे तेजस्वी विचार ही 'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटकाची वैशिष्ट्ये आहेत. १९३१ साली मा. दीनानाथ मंगेशकर यांनी हे नाटक रंगमंचावर आणले होते. यातील 'शतजन्म शोधताना’, ‘मर्मबंधातली ठेव ही’,‘सुकतात ही जगी या’.. अशी गाणी स्वतः दीनानाथांनी आपल्या गायकीने आणि संगीताने अजरामर केली आहेत. ८ जुलै १९१० रोजी स्वा. सावरकरांनी मार्सेलिस येथे ब्रिटिश जहाजातून जगप्रसिध्द उडी मारली होती. या दिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठानने ८ जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग योजला आहे. हे नाटक नव्या स्वरूपात व्यावसायिक रंगमंचावर येत असून देशात जिथे जिथे मराठी समाज आहे तेथे हे नाटक पोहोचेल. याचे १०० प्रयोग करण्याचा प्रतिष्ठानचा संकल्प आहे, असे प्रतिपादन रवींद्र साठे यांनी केले.
नाटकाचं नेपथ्य संदेश बेंद्रे,प्रकाशयोजना अमोघ फडके,नृत्ये सोनिया परचुरे, वेशभूषा मयूरा रानडे, रंगभूषा श्रीकांत देसाई यांनी केली आहे. नाटकाचे सूत्रधार दिपक गोडबोले आहेत. या नाटकास अधिकाधिक लोकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.