
विश्वास नांगरे-पाटील यांनी महापालिका शाळांमधील मुलांच्या पंखात भरले बळ
मुंबई : सध्याच्या विद्यार्थ्यांभोवती, नव्या पिढीभोवती मोबाईलचा विळखा आहे. या आभासी जगाच्या मोहात न अडकता आयुष्याचे ध्येय ठरवा. त्यानंतर ते गाठण्यासाठी अभ्यासाचे, वेळेचे नियोजन करा. संघर्ष करण्याची तयारी ठेवा. मनाने आणि शरीराने सुदृढ राहिलात, तरच आयुष्याची लढाई जिंकाल, असा शब्दांचे बळ अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) विश्वास नांगरे – पाटील यांनी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पंखात भरले.
मार्गदर्शनपर केलेल्या भाषणात नांगरे-पाटील यांनी दिलेले वैविध्यपूर्ण दाखले, स्वानुभव ऐकून उपस्थित विद्यार्थी अक्षरश: भारावले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) परीक्षेत मुंबई महानगरपालिकेच्या २४८ माध्यमिक शाळांमधून सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि शाळांचा गुणगौरव सोहळा भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात गुरुवारी २६ जून २०२५ रोजी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने विश्वास नांगरे-पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आदींसह उपशिक्षणाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सोहळ्याला उपस्थित होते. नांगरे-पाटील यांनी त्यांच्या भाषणातून कोकरूड (जि. सांगली) येथील शालेय जीवनापासून तर दिल्ली येथील केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या तयारीपर्यंतचा प्रवास उलगडून दाखविला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून तर स्वामी विवेकानंद यांच्यापर्यंतचे दाखले देत विद्यार्थ्यांना अभ्यासातील सातत्य, नियोजन आणि ध्येयपूर्तीपर्यंत थांबायचं नाही, असे मार्गदर्शन केले.