मुंबई : राज्यातील काही भागात आजपासून चार दिवस जोरदार पाऊस बरसणार असल्याचं भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागानं म्हटलयं. पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट क्षेत्रात याचा जोर राहिल. तर मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळदार पावसाचा इशारा दिलाय.
मराठी महिना आषाढ सुरु झालाय. आषाढाचं सुंदर वर्णन महाकवि कालिदासांच्या 'मेघदूत' या महाकाव्यात आहे. ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आचार्य प्र. के. अत्रे यांनीही आषाढ महिन्याचा महिमा वर्णिला आहे. रोहिणी, मृग आणि आर्द्रा नक्षत्रातही धो धो पाऊस कोसळतो. त्यामुळं आषाढ महिन्यात सृष्टी हिरवीगार बनते. त्यामुळं डोंगर,दऱ्यात बरसणाऱ्या जलधारा आपल्याला खुणावतात. अशा या आषाढाच्या पहिल्याच दिवशी हवामान विभागानं पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट क्षेत्रात २६ जून ते २९ जून पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलीय.
सध्या उत्तर पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण झारखंड पर्यत द्रोणीय स्थिती आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाला पोषक वातावरण आहे.त्यामुळं राज्यात पावसानं पुन्हा कमबॅक केलयं. ज्यात पुढील काही दिवस बहुतांश भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.
हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा परिसराला ऑरेज अलर्ट दिलाय. तर मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर,वाशिम, यवतमाळ भागात यलो अलर्ट जाहीर केलाय.