
खराब पर्जन्य जलवाहिन्या मनपाच्या वतीने बदलण्यात आल्या
मुंबई: लालबाग उड्डाणपूलावर मागील काही दिवसांपासून पावसाचे पाणी साचून राहण्याचे प्रकार घडत असल्याने तसेच पादचाऱ्यांसह गणेश भक्तांच्या अंगावर पुलावरील पाणी पडण्याचा प्रकार घडत असल्याने लालबागकर त्रस्त होते. अखेर ही समस्या आता दूर झाली असून लालबाग पुलावरील खराब झालेल्या पर्जन्य जलवाहिनी बदलण्यात आल्याने गणेश भक्तांसह इतर पादचाऱ्यांवर होणाऱ्या पाण्याचा अभिषेक आता थांबला जाणार आहे.
माटुंगा येथील नानालाल मेहता उड्डाणपुलावरील रस्त्यामधील भाग खराब झाला असून या भागाचे पृष्ठीकरण करण्याचीही मागणी होत आहे. याशिवाय लालबाग उड्डाणपुलावर पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याबाबतही निष्कर्ष समोर आला होता. यामध्ये या पुलावरील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या बहुतेक ठिकाणी खराब झाल्या होत्या.
त्यामुळे पावसाळ्यामध्ये त्यामधून होणाऱ्या पाणी गळतीमुळे खालून जाणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांवर तसेच गणेशोत्सवादरम्यान जमणाऱ्या भाविकांच्या अंगावर साचलेले पाणी पडले जात होते. परिणामी पुलाखालून जाणाऱ्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो तसेच बऱ्याच वेळा पुलावर पाणी साचले जात होते.
त्यामुळे लालबाग पुलावरील खराब झालेल्या पर्जन्य जलवाहिनी आणि इतर पुलांवरील रस्त्यांचे बांधकाम आदींचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. याबाबत पुल विभागाचे प्रमुख अभियंता उत्तम श्रोते यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी सांगितले की, या खराब पर्जन्य जलवाहिनी आता बदलण्यात आल्या असून यामुळे पुलावर पाणी साचणार नाही आणि खाली लोकांच्याही अंगावर पडणार नाही असे त्यांनी
स्पष्ट केले.