
माझे कोकण : संतोष वायंगणकर
कोकणात सध्या भातशेतीचा हंगाम सुरू आहे. पूर्वी कोकणातील सर्वच गावातून भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जायची. अखंड कोकण भातशेतीने बहरलेलं हिरव कोकण होतं, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये भातशेती कोकणातील शेतकऱ्यांनी कमी केली. शेतकऱ्यांना भातशेतीत कामगारही मिळेनासे झालेत. यामुळे साहजिकच भातशेतीचं क्षेत्र कमी झालं. काही शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी माळरान जमीन होती त्याठिकाणी आंबा, काजू, रतांबा लागवड करण्यात आली. यामुळे मधल्या काही वर्षांत भातशेती किफायतशीर होत नाही. यामुळे भातशेतीकडे दुर्लक्ष होत गेलं. पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जात असल्याने त्याकाळी भातशेतीतून जेमतेम कुटुंबांचा वर्षभर पुरणारा तांदूळ मिळायचा; परंतु या भातशेतीत घ्यावे लागणारे कष्ट हे अफाट आहेत. मेहनतीच्या तुलनेत शेतकऱ्याला काही मिळत नाही याचा हिशोब जेव्हा शेतकरी मांडू लागला तेव्हा निश्चितच त्याला कळून चुकले की भातशेती किफायतशीर होत नाही; परंतु वडिलोपार्जित शेती असल्याने अनेक गावातून शेतकरी शेती करीत होता. त्यातही पारंपरिक भात बियाण्यांचा वापर जास्त होत होता; परंतु अलीकडे मात्र नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नव्याने बाजारात आलेल्या बियाण्यांचा वापर करीत भात उत्पादन घेतले जात आहे.
पूर्वी कोकणकृषी विद्यापीठाने विशेष करून काजूच्या अनेक जातींची निर्मिती केली. वेंगुर्ले-७ या काजू ‘बी’च उत्पन्न शेतकऱ्याला चांगलंच फायदेशीर ठरत आहे. कोकणकृषी विद्यापीठाने काही काजूच्या विकसित केलेल्या जाती आहेत. त्यामुळे काजू उत्पादनात निश्चितपणे कोकणात मोठी वाढ झाली. भाताच्या बाबतीतही कोकण कृषी विद्यापीठाकडून प्रयत्न होतात. शेतकऱ्याचे आर्थिक स्त्रोत वाढावेत हाच त्यामागचा हेतू आहे. कोकणकृषी विद्यापीठ विविध फळांच्या बाबतीत नवनवीन प्रयोग केले जात आहेत. भाताच्या बाबतीतही रत्नागिरी आठ, रत्नागिरी २४ अशा भाताच्या नवीन जाती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जातात. कोकणकृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी जवळील शिरगाव संशोधन केंद्रात कोकणसाठी एक, वेगळे भाताचे वाण विकसित करण्यात आले आहे. ‘कोकण सुवास’ असे या नव्या भाताच्या वाणाचे नाव आहे. कृषी विद्यापीठाच्या शिरगाव-रत्नागिरी येथील संशोधन केंद्रात या कोकण सुवास या वाणाला निर्मितीसाठी तब्बल दहा वर्षांचा कालावधी लागला आहे. २०१५ पासून शेती संशोधन केंद्रात या भात बियाण्यावर अभ्यास सुरू होता. तब्बल १० वर्षांच्या प्रयत्नानंतर विद्यापीठाने कोकण सुवास हे वाण निर्माण केले. या भाताला सौम्य सुवास येतो. बासमतीवर संशोधन केंद्रात गॅमा किरणांची प्रक्रिया करण्यात आली. यातूनच ही सुवासिक जात निर्माण करण्यात आली.
कोकण सुवासची ही हळवी जात आहे. ११५ ते १२० दिवस हा कोकण सुवास भात तयार व्हायला जातात. विशेष म्हणजे कोकण सुवासच्या या वाणाला महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी समितीने मान्यताही दिली आहे. पूर्वी कोकण हे भाताचं आगर मानलं जायचं. पूर्वीच्या काळी पूर्णपणे भातशेती शेणखत, पालापाचोळा या सेंद्रिय खतावरची होती. रासायनिक खतांचा वापर नव्हता. यामुळे त्या काळच्या पिकांनाही महत्त्व होतं. मधल्या काळात जरी भात शेतीकडे दुर्लक्ष होतं गेलं असलं तरीही अलीकडे नव-नवीन जास्त उत्पादन देणारी बियाणी शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नवी पिढी करू लागली. काही तरुण गावांमध्ये भातशेती करताना दिसतात. कोकणातील तरुण शेतात जातच नाही. तरुणांना कष्टच करायला नको असा जो काही एक गैरसमज पसरविला गेला आहे. त्याला छेद देण्याचे काम आजचा तरुण काही गावांमधून शेतीत प्रयोगशीलता आणून दाखवत आहे. भात उत्पादन अधिकाधिक घेऊन उत्पन्न वाढविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. कोकण हे फळपिकाबरोबरच भातशेतीला आवश्यक असणारी सकसता इथल्या मातीत आहे. रायगड जिल्ह्यात तर फार पूर्वीपासून सर्वाधिक भात पिकवला जातो. फार पूर्वीपासून रायगड जिल्हा हा भातशेतीसाठी प्रसिद्धच आहे. भातशेतीतून मिळणाऱ्या उत्पादनातून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह व्हायचा. भरपूर शेती करायची, भाताच विक्रमी उत्पादन घ्यायची वेळ पडली तर यावर्षी पिकवलेलं भात पुढच्या वर्षाला देखील पुरेल अशा पद्धतीच नियोजन असायचे. प्रत्येकाच्या घरात, कुटुंबात पुरेसा तांदूळ असायचा. त्यामुळे कोकणातील शेतकरी समाधानी वृत्तीने जीवनाची वाटचाल करणारा श्रीमंत मनाचा शेतकरी नेहमीच आनंदीच असतो. कोकणकृषी विद्यापीठाच्या या नव्या भाताच्या संशोधनाचा निश्चितच चांगला परिणाम दिसून येईल. आजही ज्या कुटुंबातून भातशेती केली जाते त्या कुटुंबासाठी ‘कोकण सुवास’ हे भाताचं नवीन वाण निश्चितच कोकणवासीयांच्या जेवणाच्या ताटातील लज्जत वाढविणारीच आहे. मात्र, या सर्व नवीन तंत्रज्ञान, संकरीत भात बियाण्यांची निर्मिती असं सर्वच नवनवीन काही होत असताना कोकणात भातशेतीच क्षेत्र आणखी वाढल पाहिजे हे खरं आहे. मात्र, या भातशेतीच्या बाबतीतही माकड, गवारेडा, रानडुक्कर या वन्य प्राण्यांकडूनही तितकाच आणि तसाच त्रास होताना दिसतो. वन्यप्राण्यांच्या एका एट्रीने सारं काही होत्याचं नव्हतं होतं. यामुळे देखील शेतकरी हवालदिल आहेत आणि नाराजही आहेत. एकदा शेतात हे वन्य प्राणी आले की शेतकऱ्याची अपार मेहनत आणि कष्टावर पाणी फेरण्याचे काम हे वन्यप्राणी करताना दिसतात. यातच परत निसर्गाचं ऋतुचक्रदेखील विचित्रपणे सुरू आहे. कधीही पाऊस कोसळतो. कडक उन्हाळा येतो. यामुळे कशाचं काहीही खरं नाही. सारीच अस्थिरता याच अस्थिरतेमुळे कोकणातील शेतकरी शेती क्षेत्राकडे वळतानाही विचार करतो. कोकण भविष्यात ‘कोकण सुवास’ ने दरवळेल अशी आजच्या घडीला अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.