आपल्या कुटुंबातील वडील, मुलगा किंवा पती घर सोडून दुसऱ्या शहरात राहायला जातो, तेव्हा कुटुंबातील सदस्यांच्या भावनिकतेला पारावार राहत नाही. त्याचप्रमाणे देशाचा सुपूत्र शुभांशू शुक्ला संशोधनासाठी अंतराळात रवाना झाला. त्याच्या कुटुंबांना जितका अभिमान आहे, तितकाच तो भारतीय असल्याचा गर्व समस्त देशवासीयांना आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रात आज हा एक ऐतिहासिक क्षण मानला जातो. देशभर शुभांशूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे अंतराळात गेलेले भारताचे दुसरे अंतराळवीर आहेत. अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी त्यांच्या तीन सहकाऱ्यांबरोबर मिळून ‘ॲक्सिऑम-४’ या अंतराळ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने बुधवारी दुपारी उड्डाण केले. ‘ऑक्सिओम-४’चे हे अंतराळातील चौथे खासगी अभियान आहे. हे नासा आणि स्पेसएक्सचे संयुक्त अभियान आहे. या अंतराळ मोहिमेत चार देशांमधील ४ अंतराळवीरांचा समावेश आहे. भारत, अमेरिका, पोलंड, हंगेरी हे देश आहेत, जे अंतराळवीर या मोहिमेत समाविष्ट आहेत.
नासाच्या फॉल्कन-९ या रॉकेटद्वारे फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून त्यांनी अवकाशात झेप घेतली. ४१ वर्षांनंतर भारतीय व्यक्ती अंतराळात गेल्याचा वेगळा आनंद आहे. याआधी ३ एप्रिल १९८४ रोजी भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा हे सोव्हिएत संघाच्या मदतीने अवकाश मोहिमेवर गेले होते. आता वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळ मोहिमेवर गेले आहेत. एक वर्षाचे प्रशिक्षण व कठोर मेहनतीनंतर शुक्ला यांची नासाने या मोहिमेसाठी निवड केली आहे. या मोहिमेत अंतराळातील पिकांच्या उगवणीसाठी महत्त्वाचं संशोधन करण्यात येणार आहे. त्यामुळे भारत केंद्रित अंतराळ शेती आणि भविष्यातील अंतराळ संशोधनाच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या मोहिमेसाठी ५४८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणाऱ्या शुभांशू शुक्ला यांना लढाऊ विमान उडवण्याचा अनुभव आहे. या मिशनमध्ये ते मिशन कमांडर असणार आहेत. चाळीस वर्षीय शुभांशू यांचा जन्म लखनऊमध्ये झाला. जून २००६ मध्ये ते भारतीय हवाईदलात दाखल झाले. मार्च २०२४ मध्ये ते ग्रुप कॅप्टन बनले. एक दुर्मीळ योगायोग असा की, राकेश शर्मा यांच्या मोहिमेला ४१ वर्षे झाली आहेत; परंतु ४० वर्षांचे शुभांशू हे राकेश शर्मांनंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. शुभांशू शुक्ला यांनी सु-३०, मिग-२१, मिग-२९, जगुआर, हॉक, डोर्नियर आणि एएन-३२ सह विविध विमानांवर २ हजारांपेक्षा अधिक तास उड्डाण केले आहे. २०१९ मध्ये त्यांनी रशियाच्या गगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये अंतराळ यात्री म्हणून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर भारताच्या गगनयान मिशनसाठी त्यांची इस्राेकडून निवड झाली होती.
मोदी-बायडेन करारातून जन्मलेली मोहीम आहे. या मोहिमेची घोषणा जून २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील दौऱ्यात झाली होती. यामध्ये इस्राे आणि नासा यांच्यातील सहकार्याने भारतीय अंतराळवीराला अंतराळात पाठवण्याचा निर्णय झाला होता. या अंतराळ मोहिमेसाठी भारताने एक जागा मिळवण्यासाठी ५५० कोटी रुपये अॅक्सिअम स्पेसला दिले आहेत. हे भारताच्या जागतिक अंतराळ सहकार्याचे प्रतीक आहे. ही मोहीम "मिशन आकाशगंगा" या नावाने ओळखली जाते. यापूर्वी अॅक्सिओम-४ मोहिमेचे प्रक्षेपण अनेक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आले होते. पूर्वी निश्चित वेळापत्रकाबद्दल बोलायचे झाले तर ते २९ मे रोजी प्रक्षेपित होणार होते. तथापि, त्यावेळी ते पुढे ढकलण्यात आले आणि नंतर ते ८ जून, १० जून आणि ११ जून रोजी पुढे ढकलावे लागले. अखेर, दीर्घ प्रतीक्षेनंतर, ते २५ जून रोजी प्रक्षेपित करण्यात आले. दोन आठवड्यांच्या या मोहिमेचे नेतृत्व माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन करत आहेत. या मोहिमेत एकूण ६० वैज्ञानिक प्रयोग करण्यात येणार असून, त्यापैकी ७ प्रयोग भारतातील संशोधकांनी सुचवले आहेत. ज्यात मूग आणि मेथीची लागवड करण्याचा समावेश आहे. पृथ्वीवर करोडो लोकांना त्रस्त करणाऱ्या डायबेटिस अर्थात, मधुमेहावरील उपचारात क्रांती घडवण्यासाठी आता अंतराळाची मदत घेतली जात आहे. अॅक्सिअम-४ मोहिमेतील अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अत्यल्प गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत इन्सुलिनवर अभ्यास करणार आहेत. या संशोधनामुळे मधुमेहींसाठी अधिक प्रभावी आणि स्थिर इन्सुलिन तयार करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पृथ्वीवर इन्सुलिनचे रेणू एकत्र येऊन गुठळ्या तयार होतात, ज्यामुळे त्याची परिणामकारकता कमी होते. इन्सुलिन पंपांसारख्या उपकरणांमध्ये यामुळे अडथळे निर्माण होतात. मात्र, अंतराळातील मायक्रोग्रॅव्हिटीच्या वातावरणात ही प्रक्रिया अत्यंत मंदावते. यामुळे शास्त्रज्ञांना इन्सुलिनच्या रेणूंची गुठळी तयार होण्याच्या प्रक्रियेचे अधिक सखोल विश्लेषण करण्याची संधी मिळणार आहे. या मोहिमेतील अंतराळवीर या प्रक्रियेचा अभ्यास करून असा डेटा गोळा केला जाईल. ज्याच्या मदतीने पृथ्वीवर अधिक स्थिर आणि जास्त काळ टिकणारे इन्सुलिन विकसित करता येईल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. हे संशोधन यशस्वी झाल्यास, ते केवळ इन्सुलिनची परिणामकारकता वाढवणार नाही, तर मधुमेहावरील उपचारांचा खर्च कमी करण्यासही मदत होणार आहे.
"माझ्याबरोबर, माझ्या खांद्यावर आपला तिरंगा आहे. हा तिरंगा मला सांगतोय की, मी या प्रवासात एकटा नाही. मी तुम्हा सर्वांबरोबर इथे आहे”, ही शुभांशू शुक्लाची इन्स्टाग्रामवरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, शुभांशूच्या देशप्रेमाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.