
सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे
महाराष्ट्रीय स्वयंपाकघरात कोथिंबीर वडी ही एक झणझणीत, कुरकुरीत आणि सगळ्यांच्या आवडीची पारंपरिक डिश आहे. बहुतेक वेळा वड्या खाऊन उरतात आणि मग त्या कशा वापरायच्या, असा प्रश्न पडतो. अशावेळी आजी-आईंच्या स्वयंपाकघरातून आलेली एक सुंदर कल्पना म्हणजे – उरलेल्या कोथिंबीर वड्यांची झणझणीत उसळ! ‘उसळीतील कोंथिबीर वडी’ ही गावाकडची आणि विस्मरणात गेलेली मस्त झणझणीत रेसिपी आहे.
साहित्य
५-६ उरलेल्या कोथिंबीर वड्या (कापून)
१ मध्यम कांदा (बारीक चिरून)
२ टेबलस्पून ओले खोबरे (ऐच्छिक)
१ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
१ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून गोडा मसाला / गरम मसाला
१ टीस्पून गूळ
१ चमचा तेल
मीठ चवीनुसार
पाणी – १ कप
कोथिंबीर सजावटीसाठी
कृती
कढईत तेल गरम करून मोहरी टाका. मोहरी तडतडली की आलं-लसूण पेस्ट टाका आणि ३० सेकंद परतवा. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतवा. हळद, तिखट, गोडा मसाला घालून नीट परतवा. १ कप पाणी आणि गूळ (ऐच्छिक आहे)घालून उकळी आणा. मीठ चवीनुसार टाका. उकळी आली की त्यात कापलेल्या कोथिंबीर वड्या घाला. मंद आचेवर ५-७ मिनिटं शिजू द्या, जेणेकरून वड्या रस्सा पिऊन मऊ होतील. वरून कोथिंबीर व खोबरं घाला. झाकण ठेवून २ मिनिटं वाफ येऊ द्या.
टीप : ही उसळ थोडी पातळ ठेवली तर कोथिंबीर वड्या रस्सा छान वाटतो. हवे असल्यास थोडे भरड दाणे घालून चव अजून वाढवता येते.