Wednesday, June 25, 2025

भारतावर काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण, मोदींनी केलेली एक्स पोस्ट व्हायरल

भारतावर काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण, मोदींनी केलेली एक्स पोस्ट व्हायरल
नवी दिल्ली : भारतावर काँग्रेसने आणीबाणी लादली. ही आणीबाणी देशात लागू करण्याचा निर्णय ज्या दिवशी झाला त्या दिवसाला आज ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. आणीबाणीच्या काळात नागरिकांना स्वतःचे विचार कोणत्याही प्रकारे जाहीरपणे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य नव्हते. काँग्रेसने आणीबाणी लादून लोकशाहीची हत्या केली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट केली आहे. ही पोस्ट व्हायरल होत आहे.



काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

आज देशात आणीबाणी लागू होऊन ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते आणि इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यानंतर देशात असे वादळ उठले, ज्याचा सामना प्रत्येक भारतीयाला करावा लागला. आणीबाणीचा तो काळा अध्याय अजूनही लोकांच्या मनात एका दुःस्वप्नासारखा जिवंत आहे. इतिहासही तो काळा अध्याय कधीही आपल्या पानांवरून पुसून टाकू शकणार नाही; अशी एक्स पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.



भारतात आणीबाणी लागू झाली तो काळ देशाच्या इतिहासातील काळ्या अध्यायांपैकी एक आहे. भारतीय नागरिक हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळतात. या दिवशी भारतीय संविधानात नमूद केलेल्या मूल्यांना बाजूला ठेवून मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले. इतकेच नाही तर प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले. अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आले. सत्ताधीश काँग्रेसने लोकशाहीला ओलीस ठेवले होते.

काय म्हणाले जेपी नड्डा ?

जेव्हा आणीबाणी लागू झाली त्यावेळी मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक तरुण प्रचारक होते. आणीबाणीविरोधी चळवळ त्यांच्यासाठी एक शिकण्याचा अनुभव होता. देशावर लादण्यात आलेल्या आणीबाणीने लोकशाही रचनेचे रक्षण करण्याचे महत्त्व समजले, असे पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये नमूद केले आहे.



भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही एक एक्स पोस्ट केली आहे. यात त्यांनी नमूद केले आहे की, २५ जून १९७५ च्या मध्यरात्री तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 'अंतर्गत अशांततेचे' निमित्त करून भारतावर आणीबाणी लादून देशाच्या संविधानाची हत्या केली. या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली तरी काँग्रेसने आणीबाणी लादणे आणि देशातील नागरिकांवर आणीबाणीच्या काळात अन्याय करणे यासाठी माफी मागितलेली नाही. काँग्रेस आजही त्याच हुकुमशाही मानसिकतेत काम करत आहे.

आणीबाणीवरील पुस्तक

आणीबाणीच्या काळातील पंतप्रधान मोदींचे अनुभव आणि किस्से संकलित करुन ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने पुस्तक स्वरुपात सादर केले आहेत. या पुस्तकासाठी प्रस्तावना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी लिहिली आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा हे पण आणीबाणीचे विरोधक होते. यामुळे आणीबाणी विरोधी चळवळीतल्या नेत्याने पुस्तकाला प्रस्तावना दिली म्हणून पंतप्रधान मोदींनी देवेगौडा यांचे विशेष आभार मानले आहेत.
Comments
Add Comment