
सौंदर्य तुझं : प्राची शिरकर
प्रत्येक ऋतूनुसार आपल्याला त्वचेची काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात अनेक प्रकारच्या संसर्गाचा धोका अधिक असतो, म्हणून या ऋतूत त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असतो, त्यामुळे चेहरा सारखा स्वच्छ करावा लागतो. पावसाळ्यात आजारांसोबतच त्वचेच्या समस्याही जास्त प्रमाणात उद्भवतात. या ऋतूत चेहऱ्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर, आपल्या चेहऱ्यावर पुरळ, फोड, काळे डाग पडण्याची शक्यता असते. कारण पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेचा परिणाम थेट त्वचेवर होतो. त्यामुळे अनेक जणींना त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. स्किनच्या या समस्या कमी करण्यासाठी आपण त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम, लोशन लावतो किंवा ब्यूटी ट्रिटमेंट्स करतो. यासोबतच, पावसाळ्यात स्किनचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे देखील खूप गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी नेमके कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा आणि कोणता आहार टाळायला हवा.
असा घ्या आहार
- सकाळी उठल्यानंतर :- पावसाळ्यात दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करावी. लिंबू पाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय त्वचेसाठीही ते फायदेशीर असते. अर्ध्या तासानंतर तुम्ही भिजवलेले बदाम आणि मनुका खाऊ शकता. बदाम आणि मनुका त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
- नाश्ता :- पावसाळ्यात नेहमी पचायला हलका असणारा नाश्ता करावा. तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नाश्त्यात मूग डाळ चीला, लापशी, ओट्स असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.
- मिड मॉर्निंग ब्रेकफास्ट :- पावसाळ्यात आपण सहसा चहा, कॉफी किंवा भजी खाणे पसंत करतो. पण त्वचा निरोगी ठेवण्यासाठी या ऋतूत फळ आणि भाज्यांचे ज्युस पिणे अधिक फायदेशीर ठरेल. ज्यूस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि पाण्याची कमतरता दूर होते.
- दुपारचे जेवण :- पावसाळ्यात दुपारच्या जेवणात डाळ, भात किंवा चपाती, भाजी खाऊ शकता. दुपारच्या जेवणात सॅलडचा समावेश जरूर करावा. सॅलड त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.
- स्नॅक्स :- पावसाळ्यात आपल्याला समोसे, पिझ्झा इत्यादी चटपटीत पदार्थ स्नॅक्स म्हणून खायला आवडतात. पण फास्ट फूड खाल्ल्याने तुमचे आरोग्य आणि त्वचा दोघांनाही हानी पोहोचते.
- रात्रीचे जेवण :- रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे. रात्रीच्या जेवणात तुम्ही खिचडी, मूग डाळीचा डाेसा किंवा डाळ, भात तसेच चपाती आणि भाजी खाऊ शकता.
- फळे :- पावसाळ्यात फळांचा समावेश आवर्जून करा. जांभूळ, नासपती, आलुबुखारा, चेरी, पीच, पपई, सफरचंद आणि डाळिंब यांसारखी हंगामी फळे खाल्ल्याने जीवनसत्त्वे अ, क, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर सारख्या पोषक तत्त्वांच्या वाढत्या मागणी पूर्ण होण्यास मदत होते.
पावसाळ्यात हे खाणे टाळा
पावसाळ्यात तेलकट व मसालेदार पदार्थ शक्य तितके खाणे टाळा. कारण त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईलच पण ते तुमच्या त्वचेसाठीही हानिकारक ठरू शकते. म्हणून, तुमची त्वचा चमकदार बनवण्यासाठी, तुमच्या आहारात जास्तीत जास्त फळे आणि आरोग्यदायी पेये समाविष्ट करा.
(टीप : वरील सर्व बाबी प्रहार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. ही माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. या लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी प्रहार घेत नाही आणि कोणताही दावा करत नाही.)