Wednesday, June 25, 2025

जिल्ह्यातील शेतकरी अद्याप नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

जिल्ह्यातील शेतकरी अद्याप नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

अलिबाग : रायगड जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या ६५ हजार १९१ शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई प्रशासनाकडे जमा झाली होती. मात्र, ५३ हजार शेतकऱ्यांची नुकसानभरपाई आजपर्यंत मिळालेली नाही. शेतकऱ्यांचे बँक खाते केवायसी अपडेट नसल्याने पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात अडचणी येत आहेत.


प्रशासनातर्फे शेतकऱ्यांनी केवायसी अपडेट करण्याबाबत आवाहन करण्यात आले. मात्र, शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.


२०२२-२४ या कालावधीत ६५ हजार १९१ शेतकऱ्यांचे २२ हजार ३०९.१९ हेक्टर क्षेत्र नैसर्गिक आपत्तीने बाधित झाले. या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईपोटी २६ कोटी ७२ लाख ९८ हजार रुपये निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला होता.


यापैकी १२ हजार १३५ शेतकऱ्यांना ११ कोटी २९ लाख ५३ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला. मात्र, ५३ हजार ५६ शेतकरी अद्याप नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. जिल्हा प्रशासनाकडे १५ कोटी ४३ लाख ४५ हजार रुपये निधी शिल्लक असूनही नुकसानभरपाईचे पैसे वितरित झाले नसल्याचे मागील आढावा बैठकीत समोर आले होते.


रायगड जिल्ह्यात अवेळी पाऊस, वादळ, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती, फळबागांचे नुकसान झाले. २०२२ मध्ये ऑक्टोबर, २०२३ मध्ये मार्च, जून, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, २०२४ मध्ये मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर या कालावधीत ६५,१९१ शेतकऱ्यांच्या २२,३०९.१९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. दरम्यान, नुकसान झाल्यानंतर कृषी विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानुसार, शासनाने २६ कोटी ७२ लाख ९८ हजार रुपये निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला होता.


निधी प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने ज्यांचे बँक खाते केवायसी अपडेट होते अशा १२ हजार १३५ शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी वर्ग केला आहे. मात्र, उर्वरित ५३ हजार ५६ शेतकऱ्यांचे बँक खाते केवायसी अपडेट केले नसल्यामुळे अनुदान निधीपासून वंचित राहिल्याचे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment