
राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर
मुंबई : ‘झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो…,’ या म्हणीचा वापर करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सल राहुल गांधींना अजूनही बोचत असून, त्यातूनच ते मतदारवाढीबाबत निराधार आरोप करत आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
मुख्यमंत्री फडणवीस केवळ टीका करूनच थांबले नाहीत तर, ज्या मतदारसंघांमध्ये मतदारवाढ झाली आणि तिथे काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवारच जिंकले, अशा मतदारसंघांची आकडेवारीच त्यांनी एक्सवर पोस्ट करत जाहीर केली आहे. राहुल गांधी यांनी काही मतदारसंघांतील मतदारवाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपवर आरोप केले होते. या आरोपांना उत्तर देताना फडणवीस यांनी एक्स पोस्टवरून म्हटले आहे की, महाराष्ट्रात असे २५ पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत, जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदार वाढले आणि त्यातील अनेक ठिकाणी काँग्रेसला विजय मिळाला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये महाराष्ट्रातील काही प्रमुख मतदारसंघांची उदाहरणे देत राहुल गांधींच्या आरोपांमधील हवाच काढून घेतली आहे. पश्चिम नागपूर येथे ७% मतदार वाढले आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे विजयी झाले. उत्तर नागपूर : येथेही ७% मतदार वाढले आणि काँग्रेसचेच नितीन राऊत विजयी झाले. वडगाव शेरी (पुणे) येथे तब्बल १०% मतदार वाढले आणि शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे विजयी झाले. मालाड पश्चिम (मुंबई) येथे ११% मतदार वाढले आणि काँग्रेसचे अस्लम शेख विजयी झाले. मुंब्रा (ठाणे) येथे ९% मतदार वाढले आणि शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले.
काँग्रेसमधील संवादाच्या अभावावरही ठेवले बोट
महाराष्ट्राच्या दारुण पराभवामुळे तुमचे दुःख दिवसेंदिवस वाढत आहे हे मी मान्य करतो. पण तुम्ही किती काळ हवेत बाण सोडत राहणार? ही आकडेवारी सादर करण्यासोबतच भाजपने काँग्रेसमधील अंतर्गत संवादाच्या अभावावरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, ‘राहुल गांधींनी असे आरोप करण्यापूर्वी किमान आपल्याच पक्षाचे आमदार अस्लम शेख, विकास ठाकरे, नितीन राऊत यांच्यासारख्या जुन्या सहकाऱ्यांशी एकदा बोलून घ्यायला हवे होते. असे केले असते, तर काँग्रेसमधील संवादाच्या अभावाचे इतके वाईट प्रदर्शन झाले नसते,’ असा खोचक सल्लाही भाजपने दिला आहे.