
नवी दिल्ली : सीबीएसई दहावीच्या बोर्डाची परीक्षा २०२६ पासून आता वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने वर्षातून दोनदा दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्याच्या नियमांना मान्यता दिली आहे.ही शिफारस नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आली आहे.
या निर्णयानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची संधी मिळेल. जर एखाद्या विद्यार्थ्याचे गुण पहिल्या टप्प्यात कमी असतील तर तो दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी करून सुधारणा करू शकेल. सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज म्हणाले, "पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा मेमध्ये होईल.
दोन्ही टप्प्यांचे निकाल अनुक्रमे एप्रिल आणि जूनमध्ये जाहीर केले जातील. विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात बसणे अनिवार्य असेल. तर दुसरा टप्पा पर्यायी असेल. विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान आणि भाषा यापैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये त्यांची कामगिरी सुधारण्याची परवानगी असेल." मंजूर केलेल्या निकषांनुसार हिवाळी सत्रात सहभागी होणाऱ्या शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना को1णत्याही टप्प्यावर बोर्डाच्या परीक्षेला बसण्याचा पर्याय असेल. शैक्षणिक सत्रादरम्यान अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच करण्यात येणार आहे.