
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने अनेक वर्षांनंतर रेल्वे तिकिटांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे महामंडळ १ जुलै २०२५ पासून तिकिटांचे नवे दर जाहीर करणार आहे. नव्या नियमानुसार तत्काळ तिकीट काढण्यासाठी आधार प्रमाणीकरण (आधार व्हेरिफिकेशन) बंधनकारक आहे. रेल्वे मंत्रालयाने १० जून २०२५ रोजी आधार प्रमाणीकरणाबाबतचे निर्देश जारी केले आहेत. आधार प्रमाणीकरणामुळे तत्काळ तिकिटांच्या दलालीला तसेच अनधिकृत एजंटना आळा घालणे शक्य होणार आहे.
तिकीट दरवाढ
रेल्वेने रेल्वे तिकिटांच्या दरात वाढ केली आहे. रेल्वेच्या निर्णयानुसार नॉन-एसी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये आता प्रति किलोमीटर १ पैशाने वाढ होईल, तर एसी क्लासमध्ये ही वाढ २ पैशांनी होईल. या तिकीट वाढीमुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे .
तत्काळ बुकिंगसाठी आधार अनिवार्य
रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्येही मोठा बदल केला आहे. १ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक असेल. रेल्वे मंत्रालयाने १० जून २०२५ रोजी आदेश जारी केला आहे आणि सर्व रेल्वे विभागांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे .आता तत्काळ तिकिटे फक्त इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे बुक करता येतील आणि यासाठी आधार पडताळणी आवश्यक असेल. इतकेच नाही तर १५ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकिट बुकिंग दरम्यान एक अतिरिक्त पायरी जोडली जाईल ज्यामध्ये आधार पडताळणी करावी लागेल. म्हणजेच, आता तुम्हाला तिकीट बुक करण्यापूर्वी तुमच्या आधार क्रमांकाद्वारे OTP पडताळणी करावी लागेल.
तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये अनधिकृत एजंट्सचा हस्तक्षेप रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कडक उपाययोजना केल्या आहेत. नवीन नियमांनुसार, रेल्वेच्या अधिकृत बुकिंग एजंट्सना पहिल्या दिवशी सुरुवातीच्या अर्ध्या तासाच्या वेळेत तत्काळ तिकिटे बुक करण्यास मनाई करण्यात आली आहे.
या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स आणि IRCTC ला आवश्यक तांत्रिक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेने सर्व रेल्वे विभागांना या बदलांची माहिती देण्यास सांगितले आहे. तत्काळ बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत करणे हे या निर्णया मागील उद्देश आहे.