
मुंबईचा समुद्र खवळला: ५ दिवस मोठी भरती , १९ वेळा उंच लाटांचा इशारा
मुंबई : यंदा मुंबईचा समुद्र जरा जास्तच खवळणार आहे. आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच २४ ते २८ जूनपर्यंत समुद्राला मोठी भरती येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात तब्बल १९ वेळा समुद्राच्या लाटा ४.५ मीटरपेक्षा उंच उसळणार आहेत. चला तर जाणून घेऊया या मोठ्या भरतीच्या तपशील आणि सुरक्षेच्या सूचना.
मुंबईचा समुद्र यंदाच्या पावसात जरा जास्तच खवळणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबरदरम्यान १९ वेळा मोठ्या भरतीची शक्यता मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने वर्तवलीय. त्यापैकी पहिली मोठी भरती २४ जूनपासून सुरू होतेय. आणि हो, ही भरती 28 जूनपर्यंत सलग पाच दिवस राहणार आहे. २५ जूनला दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी उसळणाऱ्या लाटांची उंची ४.७१ मीटर इतकी असणार आहे. तर २६ जूनला दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी उसळणाऱ्या लाटांची उंची ४.७५ मीटर असणार आहे. म्हणजेच २६ जूनला उसळणारी लाट ही सर्वाधिक उंच असेल. त्यामुळे या काळात समुद्रकिनाऱ्यांवर फिरणं धोकादायक ठरू शकतं. जुलैमध्ये २४ ते २७ या तारखांदरम्यान चार दिवस तर ऑगस्टमध्ये १० ते १२ आणि २३ ते २४ तारखेला मोठी भरती येणार आहे. तर सप्टेंबरमध्ये ८ ते ११ तारखांदरम्यान मोठ्या भरतीचा इशारा देण्यात आलाय. या सर्व भरतीदरम्यान लाटांची उंची ४.५ मीटरपेक्षा जास्त असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. २५ जुलैला दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी लाटांची उंची ४.६६ मीटर इतकी असेल तर ११ ऑगस्ट दुपारी १ वाजून १९ मिनिटांनी लाटांची उंची ४.५८ मीटर इतकी असेल. त्याचबरोबर ९ सप्टेंबरल दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांनी लाटांची उंची ४.६३ मीटर इतकी असेल. त्यामुळे मोठ्या भरतीदरम्यान समुद्रकिनाऱ्यावर जाणं धोकादायक आहे. त्यामुळे नागरिकांनी सूचनांचं पालन करावं आणि सुरक्षित राहावं, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलंय.
मोठ्या भरतीमुळे मरिन ड्राईव्ह, वरळी, वांद्रे, जुहू आणि दादरसारख्या चौपाट्यांवर जाताना काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच किनारी भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचंही आवाहन करण्यात आलंय. समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी किंवा फिरण्यासाठी जाऊ नका, भरतीच्या वेळी खड्डे खणणं किंवा किनाऱ्यावर खेळणं टाळा, महानगरपालिकेचा हेल्पलाईन क्रमांक १९१६ यावर संपर्क साधा, पावसाळ्यात हवामान अंदाज तपासत राहा अशा अनेक सूचना महानगरपालिकेने केल्या आहेत. यंदा पावसाळ्यात मोठ्या भरतीसोबत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मुंबईमधील सखल भागात पाणी साचण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सूचनांचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे. तरीही मुंबई महानगरपालिकेनं २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवलाय. अग्निशमन दल, पोलीस आणि हवामान खातंही सतर्क आहे. किनारी भागात गस्त वाढवण्यात आलीय, तर मुंबईतील सखल भागात पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पंप बसवण्यात आले आहेत. तेव्हा मुंबईकरांनो, यंदा मुंबईचा समुद्र जरा जास्तच खवळणार आहे. तेव्हा समुद्राच्या या उंच लाटांपासून सावध राहा, सतर्क राहा आणि काळजी घ्या.