
अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात पे अँड पार्क सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील वाहतुकीला व पार्किंगला शिस्त लागावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात काही ठिकाणी पे अँड पार्क सुरू करण्यात आले आहे. काही ठिकाणी नो पार्किंग झोन करून तेथे फलकही लावले आहेत. अशा नो पार्किंग झोनमध्ये लावलेली वाहने व बेशिस्तपणे लावलेली वाहने टोविंग व्हॅनमार्फत कारवाई करून जप्त करावी, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ठेकेदार संस्थेला दिले आहेत.
शहरातील रस्त्यांवर पे अँड पार्कच्या अंमलबजावणीसाठी रस्त्याच्या दुतर्फा जागा निश्चित करून दिलेल्या आहेत. तसेच, नो पार्किंग झोनही निश्चित केलेले आहेत. या नो पार्किंग झोनमध्ये नागरिक वाहने लावत आहेत. विशेषतः प्रोफेसर चौक येथे चौपाटीवर येणारे ग्राहक अस्ताव्यस्त वाहने लावत आहेत. तसेच, झोपडी कॅन्टीन ते टीव्ही सेंटर रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने लावली जात आहेत. या ठिकाणी नो पार्किंग झोन आहे. बेशिस्त पार्किंगमुळे व नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अशा वाहनांवर महानगरपालिकेमार्फत कारवाई केली जाणार आहे. बेशिस्तपणे व नो पार्किंग झोनमध्ये लावलेली वाहने टोविंग व्हॅनमार्फत जप्त करून सदर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले आहेत.दरम्यान, बायपास रस्त्यावर टोल आकारणी सुरू झाल्याने मनमाड महामार्ग, छत्रपती संभाजीनगर महामार्ग, कल्याण रोड, सोलापूर व दौंड महामार्गाकडे येणारी व जाणारी वाहने शहरातून प्रवेश करत आहेत. त्यात अवजड वाहनांसह चारचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. ही रहदारी वाढल्याने शहरातील महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. त्यामुळे शहरातून होणारी अवजड वाहतूक बायपास रस्तामार्गे वळवावी, यासाठी पोलिस प्रशासनाची भेट घेऊन चर्चा करणार आहे. तसेच, बायपास रस्त्यावर चारचाकी वाहनांना टोल माफ केल्यास शहरातील रहदारीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करणार असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.