Monday, June 23, 2025

जामखेडमध्ये काळ्या काचा कुणाच्या आश्रयाने ?

जामखेडमध्ये काळ्या काचा कुणाच्या आश्रयाने ?

पीएसआयच्या धडाकेबाज कारवाईने राजकीय मंडळींच्या भुवया उंचवल्या


जामखेड : जामखेड शहरात गेल्या काही महिन्यांपासून नियम धाब्यावर बसवून मोकाट सुटलेल्या वाहनचालकांवर अखेर पोलिसांचा चाप बसला आहे. नुकतेच रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे यांनी पहिल्याच दिवशी शहरात ट्रिपलसीट, काळ्या काचा, विना नंबर प्लेट आणि मोठा आवाज करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करत तब्बल १० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.


या धडक कारवाईने वाहनचालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे, तर काही स्थानिक राजकीय मंडळींनी या विषयाकडे दुर्लक्ष करत स्थानिक गुंड प्रवृत्तीला मोकळे रान दिल्याचा लोकांमध्ये सूर आहे. त्यामुळे पोलिसांची ही मोहीम राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानली जात आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार ही मोहीम खर्डा चौकात राबविण्यात आली. शहरात गतीरोधक नसलेल्या भागांमध्ये सुसाट वेगात दुचाकी चालवणाऱ्या, कागदपत्रे न बाळगणाऱ्या वाहनधारकांवर थेट कारवाई झाली. काळ्या काचा बसवलेल्या गाड्यांचा वापर अनेकदा राजकीय मंडळींच्या 'विशेष कार्यासाठी' होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा असल्याने या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले होते.यापुढे काळ्या काचा, विना नंबर प्लेट वाहने,अवाजवी हॉर्न,ट्रिपलसीट प्रवास करणाऱ्यांवर पोलिसांचा जास्तीत जास्त 'फोकस' राहणार आहे, असे किशोर गावडे यांनी सांगितले.वाहनांवरील नंबर लपवणे, अतिशय लहान अक्षरात लिहिणे यावरही लक्ष ठेवले जात आहे.



नव्या पीएसआयची धडक शैली; स्थानिक राजकारणाला धक्का


या कारवाईने काही राजकीय मंडळींना अचानक धक्का बसल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तींचा वावर थांबवण्यासाठी पोलिसांची ही तयारी दिसत असून, 'आता कोणालाही पोलिसांकडून सूट मिळणार नाही' असा स्पष्ट संदेश मिळाला आहे.पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशी संशयास्पद वाहने दिसल्यास तात्काळ जामखेड पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा.



नागरिकांचा सवाल :राजकीय आशीर्वादाखाली होती का ही वाहने?


गेल्या काही महिन्यांपासून या गाड्यांचा मोकाट वावर पाहता काही गाड्यांना स्थानिक राजकीय आश्रय आहे का? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.आता पोलीस दलाने याची दखल घेतली असून इतरही गावांमध्ये अशी मोहिम झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून सुरू आहे.

Comments
Add Comment