Monday, June 23, 2025

अर्थनगरी चिंतेत, ॲपल चर्चेत...

अर्थनगरी चिंतेत, ॲपल चर्चेत...

महेश देशपांडे


इस्रायल आणि इराणमधील संघर्षाच्या निमित्ताने नवा आखाती संघर्ष पाहायला मिळत आहे. हे युद्ध जास्त काळ चालल्यास भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याच सुमारास भारताच्या बासमती तांदळाच्या निर्यातीला फटका बसला आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या शुल्कवाढीच्या धमकीनंतरही भारतात निर्मिलेल्या ९७ टक्के आयफोनची अमेरिकेत विक्री झाल्याचे दिसून आले आहे.


इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम झाला नसला, तरी हा संघर्ष आणखी वाढल्यास भारताला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. या लढाईमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात. शेअर बाजारातही चढ-उतार होऊ शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवर रुपयाचे मूल्यही घसरू शकते. जहाजांनी माल पाठवण्याचा खर्च वाढू शकतो. अर्थ मंत्रालय आणि इतर सरकारी संस्था बाजारपेठांवर लक्ष ठेवून आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडत आहे हे ते पाहतील. अर्थव्यवस्था मजबूत असल्यामुळे भारत अशा कोणत्याही समस्येला सहज तोंड देऊ शकतो. त्यातून भारताचे फार मोठे नुकसान होणार नाही. या युद्धाचा फटका इतर गोष्टींच्या किमतीवर फार काळ दिसणार नाही.


दरम्यान इराण आणि इस्रायलच्या या तणावात भारतीय शेअर बाजार कोसळला. इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळत असल्याने गुंतवणूकदार घाबरले होते. त्यामुळे अनेकांनी बाजारातून पैसे काढून घेतले. सेन्सेक्स आणि निफ्टी ०.७ टक्क्यांनी घसरले होते. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला. रुपयाचे मूल्य ०.६ टक्क्यांनी घसरून ८६.०९ टक्क्यांवर पोहोचले. डॉलरची किंमत अधिक होत असल्याने असे घडल्याचे सांगण्यात आले. इस्रायलच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती १२ टक्क्यांनी वाढून प्रति पिंप ७८.५ डॉलर्स एवढा झाल्या; पण नंतर खाली आल्या. इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे मध्य पूर्वेत अशांतता निर्माण झाल्यामुळे पंजाबमधील बासमती तांदळाच्या निर्यातदारांची झोप उडली आहे. मध्य पूर्वेत असे अनेक देश आहेत, जे भारतातून मोठ्या प्रमाणात बासमती तांदूळ आयात करतात. सध्या बासमती तांदूळ वाहून नेणारी अनेक जहाजे प्रवासात मध्येच आहेत. दोन्ही देशांमधील युद्ध सुरू राहिल्यास जहाजांना मधूनच परतावे लागू शकते. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल. ‘पंजाब बासमती एक्सपोर्टर्स असोसिएशन’चे अशोक सेठी यांनी सांगितले की, या युद्धाला तोंड देणे आपल्या क्षमतेबाहेर आहे. बासमती तांदळाच्या अनेक खेपांसह आमची अनेक जहाजे आधीच मध्यभागी आहेत. तणाव वाढल्यास ते त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे आमचे लाखोंचे नुकसान होईल. मध्य पूर्व हा भारताकडून बासमती तांदळाचा मोठा खरेदीदार आहे आणि पंजाब देशाच्या एकूण बासमती उत्पादनापैकी ४० टक्के उत्पादन करतो. इस्रायलने इराणच्या अनेक अणु आणि लष्करी केंद्रांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर इराणनेही इस्रायलवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनीही इस्रायलला देशावर हल्ला केल्याबद्दल ‘कठोर शिक्षा’ देण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर सेठी म्हणाले की, निर्यात करायच्या वस्तूंचा विमा मिळवण्यातही अडचणी येत आहेत. कारण, तणावाचे वातावरण असल्यामुळे विमा कंपन्यादेखील कव्हर देण्यास नकार देत आहेत. हा विषय बासमती तांदळापुरता मर्यादित नाही. युद्ध वाढल्यास तेल आयातीतही समस्या येतील. त्यामुळे भारताचे मोठे नुकसान होईल. कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा)नुसार, २०२२ मध्ये बासमती तांदळाच्या निर्यातीतून भारताने ४८ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन कमावले. त्यात पंजाबचा वाटा किमान ४० टक्के होता. दुसरीकडे, इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारतातून इराणला बासमती तांदळाच्या निर्यातीवर आधीच परिणाम झाला आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताने इराणकडून तेल आयात करणे बंद केले आहे. यामुळे इराणकडे भारताला रुपयांमध्ये पैसे देण्यासाठी साठा नाही. दुसरीकडे इराणी चलनामध्ये घसरण झाल्यामुळे आयातदेखील महाग झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये (३.५४ अब्ज) इराणचा वाटा सुमारे २३ टक्के (०.८१ अब्ज डॉलर) होता. २०२२ ते २०२५ दरम्यान हा वाटा बारा टक्क्यांपर्यंत (०.७५ अब्ज डॉलर) घसरला आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतरही अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या ॲपलचे ९७ टक्के आयफोन भारतात बनवले जात आहेत. या वर्षी मार्च ते मे दरम्यान भारतातून ॲपलने निर्यात केलेल्या सर्व आयफोनपैकी ९७ टक्के आयफोन अमेरिकेत पाठवले गेले. त्यांची एकूण किंमत २७ हजार सातशे कोटी रुपये आहे. अहवालानुसार, केवळ मे महिन्यामध्ये भारतातून सुमारे ८,६०० कोटी रुपयांचे आयफोन अमेरिकेमध्ये निर्यात करण्यात आले. मार्चमध्ये सुमारे ११,१९५ कोटी रुपयांच्या आयफोन निर्यातीचा उच्चांक आहे. या वर्षी जानेवारी ते मे दरम्यान भारतातून अमेरिकेत ३७ हजार कोटी रुपयांचे आयफोन पाठवण्यात आले आहेत. २०२४ मध्ये सुमारे ३२ हजार कोटी रुपयांचे आयफोन निर्यात करण्यात आले होते. याचा अर्थ निर्यात पाच हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. २०२४ पर्यंत अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनपैकी केवळ पन्नास टक्के आयफोन भारतात बनवले जात होते. ट्रम्प यांनी ॲपलला २५ टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली. त्यानंतर हा आकडा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे.


‘ॲपल’ने भारतातून आपल्या निर्यातीची पुनर्रचना अशा प्रकारे केली आहे की, ते आता फक्त अमेरिकन बाजारपेठेतच आपली उत्पादने निर्यात करेल. यापूर्वी नेदरलँड्स, चेक रिपब्लिक आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये जास्त निर्यात केली जात होती. फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि विस्ट्रॉन हे भारतातील प्रमुख आयफोन उत्पादक आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर आयफोनच्या किंमतीत वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. यामुळे ॲपलच्या विक्री आणि नफ्यावर परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही तर, ॲपल आता ॲमेझॉन, वॉलमार्ट आणि इतर प्रमुख कंपन्यांसह व्हाईट हाऊसच्या नजरेमध्ये आले आहे. प्रत्यक्षात या कंपन्या ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे निर्माण झालेल्या अनिश्चितता आणि महागाईच्या दबावाला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रम्प ‘ॲपल’ला सतत धमकी देत आहेत की अमेरिकेत विकले जाणारे आयफोन फक्त अमेरिकेत बनवले पाहिजेत. त्यांनी हे भारतात किंवा अमेरिकेबाहेरील इतर कोणत्याही देशात उत्पादित केले, तर ते ‘ॲपल’साठी खूप महागडे ठरेल.

Comments
Add Comment