Monday, June 23, 2025

वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटणाऱ्या उद्योजकाला मृत्यूने वळसा घालून दिले जीवनदान !

वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटणाऱ्या उद्योजकाला मृत्यूने वळसा घालून दिले जीवनदान !

श्रीगोंदा : मानवतेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून सदैव समाजासाठी कार्य करणाऱ्या राजापूर (मंगलवाडी) येथील युवा उद्योजक युनूस भाई शेख यांनी यावर्षी पंढरीच्या वाटेवर असलेल्या श्री संत विठ्ठल बाबा पायी दिंडीतील सर्व वारकऱ्यांना मोफत रेनकोट वाटप केले.


या त्यांच्या कार्याची सर्वत्र चर्चा होत असतानाच काही दिवसांपूर्वी नगर-दौंड महामार्गावर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला तरी देवाच्या कृपेने शेख हे मात्र अगदी सुखरूप बचावले आणि ग्रामस्थांमध्ये ही घटना चमत्कार मानली जात आहे.मी जीवनात कधीच जात, धर्म, पंथ पाहिला नाही. कोणतीही मदतीची संधी आली तर मनापासून, सढळ हाताने ती केली. आजवर मंदिरांच्या जीर्णोद्धारात, सामाजिक- शैक्षणिक,धार्मिक उपक्रमात मी सहभाग घेतला.


बहुधा याच पुण्याईमुळे मी अपघातातून वाचलो," अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. त्यांच्या या विनम्रतेने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले.युनूस भाई शेख हे व्यवसायाने रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ‘आजमेरा प्लास्टिक’ कंपनीचे यशस्वी उद्योजक असले तरी गावाकडील कोणत्याही मंदिराचा जीर्णोद्धार, धार्मिक कार्यक्रम असो किंवा शैक्षणिक उपक्रम ते मदतीस कायम पुढे असतात. वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी रेनकोट वाटप केले. प्रत्येक ठिकाणी सरळ हाताने मदत केली. साधी राहणी उच्च विचार हे ब्रीद वाक्य घेऊन जीवन जगत असताना आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या कृतज्ञ भावनेतून नेहमीच सत्कार्य करीत राहिलो. त्याचीच पोचपावती म्हणून मला भीषण अपघातातून सुखरूप वाचवले असल्याचे मत युनुसभाई शेख यांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment