Monday, June 23, 2025

अमेरिकेची युद्धात उडी, पुढे काय...?

अमेरिकेची युद्धात उडी, पुढे काय...?

इराण आणि इस्रायल यांच्या युद्धात अमेरिका उतरली आणि दुसऱ्या महायुद्धाचे स्मरण झाले. तेव्हाही जेव्हा अमेरिका मित्र राष्ट्रांमार्फत युद्धात उतरली नव्हती, तोपर्यंत मित्र राष्ट्रांचे काही खरे नव्हते. पण ज्या दिवशी अमेरिका मित्र राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरली आणि जर्मनीला तिने देमाय धरणी ठाय करून सोडले. त्यानंतर मित्र राष्ट्रांनी युद्ध जिंकलेच आणि जर्मनीला त्याच्या आगळीकतेचे पारितोषिक देण्यात आले. पण आजची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. कारण आज इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू असले तरीही हे मानवता आणि मानवतेचे संरक्षण करू पाहणारे यांच्यातील युद्ध नाही, तर इराणचे अणू सामर्थ्य संपवण्यास सिद्ध झालेले इस्रायल आणि प्रचंड ताकदवान आणि त्या ताकदीवर जगाला नमवू पाहणारी अमेरिका यांच्यातील ही लढाई आहे.


इराणने अमेरिकेच्या हल्ल्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या चार्टरचा भंग असे म्हटले आहे. पण इराणी हल्ल्यांची बाजू न घेताही असे म्हणता येईल की, या युद्धात हानी मात्र मानवतेची होणार आहे. होर्मुझची खाडी मार्ग बंद करण्याचा निर्णय इराणने घेतला आहे. तसे झाले तर अगोदर म्हटल्याप्रमाणे भारताला त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. आता तर या युद्धाची व्याप्ती जास्त वाढली आहे. कारण होर्मुझचा मार्ग बंद झाला तर या मार्गाने येणारे पेट्रोल आणि वायू बंद होईल आणि त्यामुळे या दोन वस्तूंच्या किमती प्रचंड वाढतील. त्यामुळे अगोदरच नाजूक अवस्थेत असलेली भारताची अर्थव्यवस्था अधिकच संकटात सापडेल. हा तत्कालिक परिणाम झाला; परंतु खरा धोका आहे तो येत्या काळात शांततापूर्ण मार्गाने अण्वस्त्र प्रसार रोखण्याच्या प्रयत्नांना कायमचा सुरुंग लागेल. ते नुकसान जास्त मोठे आहे.


अमेरिकेच्या ताज्या हल्ल्यामुळे इराणच्या युरेनियम समृद्ध स्थळांचे तीन ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सारे जग अचंबित झाले आहे. इराणने जर होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला, तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी तो धोक्याचा इशारा ठरेल. हा मार्ग बंद झाला, तर जगभरातील पेट्रोल पुरवठ्यावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे आणि खामेनेई यांच्या सरकारने तसे करू नये म्हणून दबाव वाढवला तरीही आता अमेरिका त्यात उतरली असल्याने ते ऐकतील की नाही हा प्रश्न आहे. अनेक तज्ज्ञानी असा विचार केला होता की इराण इतके टोकाचे पाऊल उचलणार नाही. पण आता अमेरिकेने युद्धात उडी घेतल्याने इराणला तसे करावे लागले, तर त्याचा दोष इराणबरोबरच अमेरिकेचाही असेल आणि त्यात भारतासारखी राष्ट्रे जी दोन्ही देशांत सामंजस्य राखून आहेत त्यांनाही यात जळावे लागेल. आता इराणचे कमकुवत सैन्य आणि इराणची अमेरिकेच्या तुलनेत सामर्थ्य नसलेली युद्धसामग्री अमेरिकेच्या हल्ल्याना कसे तोंड देते हा जगासमोरचा प्रश्न आहे. जितके हे युद्ध लांबेल तितके ते जगासाठी अधिक चिंतेचे ढग घेऊन येईल. कारण इराणकडे तेलाचा साठा आहे आणि तो पुरवण्याच्या मार्गाच्या दोऱ्याही त्याच्याच हातात आहेत.


इराण प्रमाणबद्ध प्रतिसाद देईल अशी घोषणा इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरघची यांनी केली असली तरीही प्रमाणबद्ध म्हणजे किती हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे सारे जग संभ्रमात आहे. इराणचा अणू कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याचा इस्रायलचा बेत आहे आणि अमेरिका हा कित्येक वर्षांपासून इस्रायलचा मित्र असल्याने त्याच्यावरील संकट हे अमेरिका स्वतःवरील संकट समजत असल्याने अमेरिका या युद्धात उतरली आहे. या दोघांचीच मैत्री कायमची आहे आणि इस्रायलने कित्येक प्रसंगी स्वतःभोवती अरब राष्ट्रे शत्रू राष्ट्रे म्हणून असतानाही अमेरिकेच्या मदतीने या अरब राष्ट्रांना पुरुन उरला आहे. त्यामुळे या संघर्षात इस्रायलचे सामर्थ्य इराणच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे, पण होर्मुझची खाडी बंद केल्यामुळे जर भारताचे आणि उर्वरित जगाचे नुकसान झाले तर त्याला अमेरिका जबाबदार असेल असे काहीजण म्हणत आहेत.


आम्ही आधीच म्हटल्याप्रमाणे इराण आणि इस्रायल हे दोघेही भारताचे मित्र देश आहेत आणि पाकिस्तानविरोधातील संघर्षात इस्रायलने भारताला यापूर्वी चांगली साथ दिली आहे. त्यामुळे भारताने कोणतीही आततायी भूमिका न घेता युद्धापासून दोघांनीही दूर राहावे यासाठी प्रयत्न करावेत हाच भारतासाठी खरा प्रश्न राहील. अजून इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने निर्णायक वळण घेतले नाही. पण तोपर्यंत जर यातून मार्ग काढला नाही तर दोन्ही बाजू निर्णायक युद्धात उतरतील आणि त्यात जगाचा पराभव होईल. कारण इराण नष्ट होईल पण तो संपूर्ण जगाला धडा शिकवून जाईल. त्यामुळे दोन्ही बाजूंनी संयम पाळण्याची आवश्यकता आहे. कारण युद्ध झाले तर कुणाचाच विजय होत नसतो, तर केवळ रणभूमीला रक्ताने स्नान घातले जाते. इराणने बराच काळ असा दावा केला होता की, त्यांच्याकडे अणू कार्यक्रम आहे, तो शांततापूर्ण आहे. पण ट्रम्प आणि अमेरिकेच्या तज्ज्ञानी दाखवून दिले की त्यांच्याकडे अणुसाठा हा अणुबाॅम्ब तयार करण्यास पुरेसा आहे. तसे झाले तर काय अनर्थ होईल याचा विचारच न केलेला बरा. इस्रायलने इराणच्या अणुसाठ्याला बऱ्यापैकी नुकसान पोहोचवले आहे, असे बोलले जाते. तरीही त्यांच्याकडे अण्वस्त्रे आहेत ही बाब लपून राहिलेली नाही आणि जर या युद्धात ती माथेफिरूंच्या हाती लागली तर ते कुणाविरोधात वापरतील याचा काहीच भरोसा नाही. दुसरीकडे ट्रम्प यांनाही हा निर्णय धोकादायक आहे. कारण त्यांनी असे आश्वासन दिले होते की, आपण इराणला अणू कार्यक्रम मिळवू देणार नाही. पण त्यांची भूमिका ही वादात सापडली आहे. कारण इराणला अणू कार्यक्रमापासून दूर ठेवणे त्यांना शक्य होईल असे दिसत नाही. तसे झाले तर जगाचा विनाश अटळ आहे. असे म्हणतात की चौथे महायुद्ध जगात होणार नाही कारण तिसऱ्या महायुद्धात कुणी जिवंत राहणार नाही. आज जगावर तशी परिस्थिती ओढवली आहे.

Comments
Add Comment