Monday, June 23, 2025

‘घोषणांचा डोंगर... पण अंमलबजावणीचे शून्य शिलाचित्र!’

‘घोषणांचा डोंगर... पण अंमलबजावणीचे शून्य शिलाचित्र!’

साई संस्थान विश्वस्त मंडळाच्या घोषणा हवेत विरल्या


राजेश जाधव


शिर्डी : आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीच्या जागतिक दर्जाच्या विकासाचे स्वप्न दाखवत तत्कालीन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाने हजारो कोटींची गोंडस आश्वासने दिली होती; पण प्रत्यक्षात केवळ 'घोषणांचा पाऊस आणि विकासाची रखडलेली जमीन' अशी अवस्था आज शिर्डीची आहे. भाविकांच्या नजरेत धूळ फेकणाऱ्या या विश्वस्त मंडळाचा न्यायालयाने तांत्रिक दृष्ट्या कारणास्तव रद्दबादल ठरवले, पण त्यांच्या मागे सोडलेला "अपूर्तता आणि निव्वळ गाजावाजा" चा ठसा आजही करोडो भाविकांच्या मनात जिवंत आहे.


दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीपूर्वी साईबाबा संस्थान वर विश्वस्त मंडळ नियुक्त होणार यासाठी महायुतीमधील पक्षांनी विश्वस्त पदासाठी मोर्चेबांधणी करीत चाचपणी सुरु केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.मात्र तत्कालीन विश्वस्त मंडळाच्या घोषणांची अद्यापपावेतो एकही कामे मार्गी लागली नसल्याची खंत भाविकांनी आणि शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त करून दाखवली.साई समाधी शताब्दी सोहळ्यासाठी सरकारने मंजूर केलेला ३२०० कोटींचा भव्य विकास आराखडा कागदावरच ! सात वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या या आराखड्यातील एकही महत्वाचं काम पूर्णत्वास गेलं नाही, ही मोठी शोकांतिका आजही शिर्डीकरणाच्या मनात घर करून आहे.साई रुग्णालयाचे अद्ययावत रूपांतर झाले नाही केवळ नावापुरते सुधारकाम झाले.सुपर हॉस्पिटलच्या नावाने केवळ बोर्ड लावून समाधान करण्यात आले आहे.होलोग्राफिक प्रकल्प केवळ कागदावरच आहे, प्रत्यक्षात या प्रकल्पाची एक वीटही रचलेली नाही. तो प्रकल्प कुठे सुरू आहे, हे आज संस्थानलाही सांगता येणार नाही.नवीन रस्ते सुशोभीकरणापैकी पाच रस्ते जाहीर परंतु प्रत्यक्षात दोनही नाहीत. साई वॅक्स म्युझियम ? साई आयएएस अकादमी ? साई सृष्टी ? हे सगळे प्रकल्प केवळ प्रेस नोट्समध्ये ! प्रत्यक्षात त्या जागेचा ठावठिकाणा नाही.स्वागत कमानी ? प्लॅनेटोरियम ? सौर प्रकल्प ? गोशाळा ? १२५ कोटींचं कॅन्सर हॉस्पिटल ? स्काय वॉक ? सीसीटीव्ही प्रकल्प ? सगळं केवळ 'घोषणांच्या महापुरात' वाहून गेलंय. स्काय वॉकचा कडेला दगडही नाही.ग्रीन शिर्डीसाठी १ लाख वृक्ष लागवडीची मोठी घोषणा ? लेझर शो ? डान्सिंग फाउंटन ? कला दालन ? ताऱ्यांचं तारांगण ? अशा मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडला.शिर्डीच्या भाविकांना फसवणुकीचा ताऱ्यांनी सजवलेला स्वप्न महापूर... प्रत्यक्षात काहीच नाही.तांत्रिक कारणास्तव तत्कालीन विश्वस्त मंडळ बाद झाले ; पण त्यांच्या अपुऱ्या व अर्धवट प्रकल्पांच्या माळा आज सरकारच्या गळ्यात पडल्या आहेत. आता नव्या विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी हालचाली जोमात सुरु आहेत. पण हे नवे विश्वस्त मंडळ फक्त आश्वासनांचा पाऊस पाडणार का खऱ्या अर्थाने भाविकाभिमुख ठरणार, हे लवकरच स्पष्ट होईल.



'साई'च्या नावाने... फसवणुकीची 'सबुरी'!


'श्रद्धा आणि सबुरी'चा साई मंत्र देणाऱ्या संस्थानातच भक्तांना "सबुरी" धरायला लावली जातेय. घोषणा आणि प्रत्यक्ष कामातील प्रचंड दरी पाहता, विश्वस्त मंडळाचे नवे इच्छुक 'गुढघ्याला बाशिंग' बांधून तयार असले तरी भाविकांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या पुन्हा त्या जुन्याच 'स्वप्नांची दुकानं' उघडणार का? असा भयंकर प्रश्न आज उभा आहे.भाविकांचा संयम संपत चाललाय... आता विकासाचे प्रत्यक्ष काम पाहण्याची वेळ आली आहे !

Comments
Add Comment