
सतीश पाटणकर
राज्यस्तरावर आज दोन-तीन युवा नेत्यांची नावे घेतली जातात. त्यापैकीच नितेश राणे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. राज्यस्तरावर युवा नेता म्हणून स्वकर्तृत्वाने त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. आज नितेश राणे यांचे नाव सातत्याने चर्चेत असते ते त्यांच्या आत्मविश्वासी स्वभावामुळे. मत्स्य आणि बंदरे खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी या खात्याच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या आहेत. नितेश राणे पारंपरिक कामापलीकडे जाऊन त्यांनी मतदारसंघाचा विकास केला आहे. क्रिकेट अकादमी, दोनशे डिजिटल शाळा, इंटरनॅशनल स्कूल, वॅक्स म्युझियम, कचरा निर्मूलन प्रकल्प, कंटेनर थिएटर, कलादालन, वॉटर स्पोर्ट्स, रोपवे, गरीब चाकरमान्यांना फक्त १०० रुपयांत मुंबईतून गणेशोत्सवासाठी प्रवास, गरीब रुग्णांना मदत असे अनेक विकासांचे प्रकल्प व लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना त्यांनी मदत केली आहे.
कोकणचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब यांच्या पावलावर पाऊल टाकत नितेश राणे यांनी आपली राजकीय वाटचाल जोमाने सुरू ठेवली आहे. मराठा आरक्षण आंदोलनात राज्यस्तरावर नितेश राणे यांनी छाप पाडली. नितेश राणे हे नाव आता अखंड महाराष्ट्रात पोहोचले ते त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे. सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांच्या रुंदावलेल्या कार्यकक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची नवी ओळख करून देत आहेत. हे तरुण नेतृत्व उभे राहिले आणि मुंबईच्या पाणी प्रश्नापासून बेरोजगारांच्या प्रश्नापर्यंत. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात शेकडो बेरोजगार मेळावे घेऊन तरुणांच्या हाताला काम देण्याची भूमिका घेतली. त्यातून नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांना नोकरीच्या जागी उभे राहता आले. इंजिनीअर, एमबीए, उच्चशिक्षित मुलांपासून दहावी पास, नापास असलेल्या मुलांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून रोजगार मेळावे आयोजित केले आणि त्यातून हजारो बेरोजगारांना काम मिळाले. दुसऱ्या बाजूला कलानिधी संस्था आकाराला आली आणि सध्या स्पर्धेच्या युगात म्हणजे मागे पडत असलेल्या मराठी नाटक सिनेमाला नवी ऊर्जा देण्याचे काम कलानिधीच्या माध्यमातून नितेश राणे यांनी सुरू केले. ‘झालाच पाहिजे’ हे पहिले मराठी मनाला ठाव घेणारे सीमालढ्यावर आधारित नाटक उभे राहिले. कोकणच्या लोककलांना व्यासपीठ देण्यासाठी कला निधीच्या माध्यमातून कोकण लोककला महोत्सव झाला पाहिजे या दृष्टीने त्यांनी कला निधीच्या माध्यमातून महोत्सवाचे आयोजन केले. मुंबईत पाणी माफियांचे जाळे तोडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. लोकांना पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी हा लढा उभारला गेला.
गावांगावातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शिक्षणाची सोय आणि वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन लोकांचे प्रश्न जाणून घेणे आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणेही ही सामाजिक जाणीव आमदार राणेंच्या गाव भेटीतून जाणिवेची गोष्ट घडू लागली. त्यामुळे नितेश राणे व्यक्ती म्हणून न राहता चळवळ म्हणून ओळखले जाऊ लागले. लोकांना त्यांचे प्रश्न जाणणारा आणि त्यांच्या प्रश्नांशी निगडित राहून काम करणारा युवा लोकप्रतिनिधी लाभला.
मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नितेश राणे दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. विकासाचा ध्यास घेऊन कार्यरत असणाऱ्या नितेश राणे यांनी ग्रामीण भागात विविध विधायक प्रकल्प मार्गी लावले आहेत. आरोग्य समस्या, बेरोजगारी, शिक्षण समस्या, महिला अत्याचार, नागरिकांचे मूलभूत प्रश्न इ. समस्यांवर आवाज उठवण्याचे काम त्यांनी मुख्यत्वे मुंबई व महाराष्ट्रात केले. नितेश राणे यांनी इ.स २००९-१० पासून पाणीचोरी व पाणीटंचाई विरोधात मुंबईत तीव्र आंदोलन सुरू केले. टँकर माफियांविरुद्ध तक्रार करण्यासाठी नागरिकांकरिता टोल फ्री सहायता क्रमांक सुरू केला. पालिका प्रशासन, स्थानिक नेते व पाणी माफिया यांच्यात असलेल्या संगनमतानेच पाण्याचा व्यापार सुरू असल्याची टीका त्यांनी केली. इ. स. २०११ मध्ये ठाणे महानगरपालिका हद्दीत रोज १० लाख लिटर अवैधपणे पाणी उपसा करण्यात येत असलेली पाइपलाइन नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांकडून उद्ध्वस्त करण्यात आली.
नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना रोजगार प्रदान केले. ऑक्टोबर इ.स. २०११ मध्ये कामगार मैदान, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्यात एकाच दिवसात २५,००० हून अधिक रोजगार देण्यात आले. हा रोजगार मेळावा जागतिक विक्रम म्हणून ओळखला जातो, या रोजगार मेळाव्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.
सप्टेंबर इ.स.२०११ मध्ये मराठी चित्रपट, नाट्यसृष्टी व मनोरंजन क्षेत्राचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून नितेश राणे व अनंत पणशीकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र कलानिधी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून दिग्दर्शक संजय जाधव यांच्या दुनियादारी या चित्रपटासाठी सहाय्य करण्यात आले होते. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून मराठी चित्रपट व मालिका दिग्दर्शकांना उत्तम लोकेशन्स मिळावेत आणि अद्ययावत तंत्रसामग्री उपलब्ध व्हावी या हेतूने नितेश राणे व महाराष्ट्र कलानिधीच्या संकल्पनेतून मालवणमध्ये चित्रनगरी उभारण्यात येत आहे.
फेब्रुवारी इ.स.२०१२ मध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळावी, स्थानिक लोकांना रोजगार मिळावा व येथे येणाऱ्या पर्यटकांना योग्य माहिती मिळावी याकरिता नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग टूर गाईड हा उपक्रम सुरू करण्यात आला. फेब्रुवारी इ. स. २०१४ मध्ये, नितेश राणे यांनी नोकरी एक्स्प्रेस या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली, स्थानिक युवकांना त्यांच्याच गावात किंवा जवळच्या तालुक्याच्या/शहराच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाल्यास, महाराष्ट्र या माध्यमातून समृद्ध करता येऊ शकेल हा उद्देश समोर ठेवण्यात आला. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे भारतातील अशा प्रकारचे हे पहिलेच फिरते केंद्र ठरले. मे इ.स. २०१४ मध्ये, मराठी कलावंतांना एकत्र येण्याची संधी मिळावी व मराठी कलावंतांमध्ये दडलेल्या खेळाडूला वाव देण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील गल्लीबोळात लोकप्रिय असलेल्या बॅाक्स क्रिकेटला मोठे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने नितेश राणे यांनी महाराष्ट्र बॉक्स क्रिकेट लीग (एमबीसीएल) या स्पर्धेची सुरुवात केली.
राजकीय पुढाऱ्यांना फक्त घ्यायची माहिती असते. कोणाला काही द्यायचं म्हटलं की त्यांच्या पोटात गोळा उठतो. त्यातही खिशातून द्यायचं म्हटलं की अब्जावधी पुढाऱ्यांच्या चेहऱ्यावर आठ्या उमटतात. पुढारी म्हटला की, केलेल्या कामाचे सुद्धा पैसे बुडणार याचा अनुभव गाव, तालुका, जिल्हा पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेकांनी वेळोवेळी घेतलेला आहे; परंतु नितेश राणे हे या बाबतीत राजकीय पुढारी नाहीत. जिथे चांगलं सामाजिक कार्य आहे, एखादा गुणी खेळाडू आहे, हुशार पण गरीब विद्यार्थी आहे, चित्रकार, कलावंत आहे व त्याला आर्थिक मदतीची गरज आहे अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कानाकोपऱ्यांतील गरजूंना त्यांनी स्वतःच्या खिशातून मदत केली आहे. अशी शेकडो उदाहरणे सांगता येण्यासारखी आहेत. हा महाराष्ट्र राकट आणि कणखर आहे पण तेवढाच बकूळ फुलांचा, सुगंध गुलाब फुलांचे सौंदर्य आणि झेंडूंच्या फुलांचे मादर्व लाभलेला आहे. नितेश राणे यांचे व्यक्तिमत्त्व असेच घडत आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत. )