संतोष वायंगणकर
समाजामध्ये सामाजिक, राजकीय किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रांत काम करणाऱ्या काही व्यक्ती या इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा समाजमनात उमटविण्याचा प्रयत्न करतात. अशाच व्यक्तींपैकी एक म्हणजे महाराष्ट्राचे मत्स्यद्योग व बंदरे विकास विभागाचे मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा आज वाढदिवस! ना. नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून गेली पंधरा वर्षे या मतदारसंघामध्ये खरे तर व्हीजनरी काम त्यांनी केलं आहे. मागील दहा वर्षे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करतानाही कणकवली-वैभववाडी-देवगड मतदारसंघांतील प्रत्येक तालुक्याचा एका वेगळ्या पद्धतीने विकास करण्यात आला आहे. पूर्वीचा देवगड तालुका आणि आजचा देवगड तालुका एक वेगळ्या टप्प्यावर आणण्यात ना. नितेश राणे यांची महत्त्वपूर्ण भूमिका ठरली आहे. महाराष्ट्राला पर्यटन नकाशावर देवगडला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. विकासाचे व्हिजन असल्याने साहजिकच कणकवली-देवगड-वैभववाडी या प्रत्येक तालुक्याची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कोणत्या शहरात कोणत्या पद्धतीने विकासप्रक्रिया राबविली पाहिजे तर त्या शहराचा, तालुक्याचा विकास होऊ शकेल याचे योग्य पद्धतीने नियोजन करत प्रत्येक तालुक्याचे चित्र पालटण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे ही त्यांची आंतरिक तळमळ असते. सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात स्थापन झालेल्या राज्यमंत्री मंडळात ना. नितेश राणे यांना मत्स्योद्योग व बंदरे विकास विभागाचे मंत्रीपद देण्यात आले. जेव्हा ना. नितेश राणे मत्स्योद्योग मंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा अनेकांनी कुत्सितपणे मत्स्यविभागात आणि बंदरे विभागात आहे काय? ते काय करतले? अशा गजाली जरूर केल्या गेल्या; परंतु ना. नितेश राणे यांनी आपल्या निर्णय क्षमतेने मत्स्योद्योग आणि बंदरे विकास विभागाला नुसता चर्चेत आणला नाही, तर या विभागांना विकासाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. महाराष्ट्राच्या अखत्यारित असणाऱ्या या दोन्ही विभागांचा कारभार, यातली गती आणि दूरदृष्टीने या विभागांच्या कामात बदललेले चित्र लोकांसमोर आले. मत्स्योद्योग मंत्री म्हणून महाराष्ट्रातील किनारपट्टीवर काम करणारा गोरगरीब मच्छीमाराला कृषीचा दर्जा देत जे मच्छीमारांच्या बाबतीत आजवर जे घडले नाही ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मंत्री म्हणून ना. नितेश राणे यांनी करून दाखवले आहे. रत्नागिरीच्या मिऱ्या बंदरावरचे अतिक्रमण ना. नितेश राणे यांनी हटवायला लावले. वर्षानुवर्षे रत्नागिरी बंदरातील मिऱ्या बंदरातील अतिक्रमण ही बंदर विभागाची फार मोठी डोकेदुखी ठरली होती; परंतु त्याबद्दल गेली अनेक वर्षे कोणत्याही अधिकाऱ्याने धाडस दाखवले नव्हते; परंतु ना. नितेश राणे यांनी बंदरे विभागाच्या जागेतील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला आणि तत्काळ कार्यवाही देखील झाली. मंत्री, आमदार यांच्याकडे निर्णय क्षमता असावी लागते. कोणतीही व्यक्ती कोणत्याही मोठ्या पदावर असली तरीही त्या पदाची शान वाढते ती केवळ त्या व्यक्तीच्या कार्य कर्तृत्वामुळेच. त्यामुळे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास विभागांना गती प्राप्त झाल्यानंतरच या विभागांचे काम लोकदृष्टीस पडले आहे. मत्स्य विभागामध्येही आजवर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील कोणीही फारसे त्याकडे कधी लक्षच घातले नव्हते. मच्छीमारांचे प्रश्न कोणते आहेत, त्यावर कशाप्रकारे उपाययोजना करायला हवी. मच्छीमार बांधवाचा आर्थिक स्तर कसा उंचावेल याचा विचारही कधी झाला नव्हता; परंतु त्यासाठी केवळ प्रयत्नच नव्हे, तर योग्य दिशा दाखविण्याचे काम ना. नितेश राणे यांनी केले आहे. कोकणातील बंदरांचा विकास करताना साहजिकच पर्यटन व्यवसायालाही त्यामुळे चालना मिळणार आहे. कोकणातील बंदर विकसित होत असताना कोकणच्या सृष्टी सौंदर्यात या बंदरांची भर कशी पडेल याचा दूरदृष्टिकोनातून ना. नितेश राणे यांचा विचार असल्याने निश्चितच त्याचा पर्यटन व्यवसायाला देखील भविष्यकालीन फायदा होऊ शकेल.
‘कल करे सो आज कर’ ही काम करण्याची कार्यपद्धती असल्यानेच देशात ‘एआय’चा प्रशासकीय कामकाजात वापर करणारा सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा ठरत आहे. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणत असताना त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे. सामान्य माणसाला प्रशासकीय काम करताना अडचण राहू नये यासाठी त्यांचा आग्रह राहतो. महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात दुर्लक्षित असलेल्या मत्स्य व बंदरे विभागाला राज्य सरकारकडून निधीही उपलब्ध करून घेतला. त्यासाठीची आर्थिक तरतूदही करण्यात आली. कोणतेही काम करताना इतरांपेक्षा वेगळ्या वाटेने आणि विचाराने काम करण्याच्या कार्यपद्धतीमुळेच मत्स्योद्योग आणि बंदरे विकास विभागात ना. नितेश राणे बदल घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जे समाजात काम उभं करायचं ते हटके असलं पाहिजे हा त्यांचा दृष्टिकोन जसा असतो आणि त्यांचा प्रयत्नही तसाच असतो. ना. नितेश राणे यांना सिंधुदुर्गसाठी, कोकणसाठी आणि महाराष्ट्रासाठी खूप काही करायचे आहे. खा. नारायण राणे यांनी कोकणच्या विकासात मैलाच दगड ठरतील अशी विकासकामे उभी केली आहेत.
त्यामुळे ना. नितेश राणे, आ. निलेश राणे यांनाही कोकणच्या विकासासाठी खूप काही करायचं आहे. मत्स्यद्योग व बंदरे विकासमंत्री ना. नितेश राणे यांना आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य श्री देव रामेश्वराने द्यावे.