
सुनील जावडेकर
कोकणात ध्येयवादी माणसांचे भरघोस पीक आहे. शिरोड्याच्या मीठ सत्याग्रहाने कोकणच नव्हे, तर देश पेटून उठला होता. त्यानंतरच्या काळात बॅ. नाथ पै, मधू दंडवते, माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, कै. भाई सावंत, डॉ. बाळासाहेब सावंत अशी अनेक लहान-थोर मंडळी कोकण विकासासाठी झटली. ते गुण आता नव्या पिढीतील मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्यात विलक्षण दिसून येतात. आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी एखादे काम मनापासून करतो. तेव्हा तो जगावेगळे मोठे गुण दाखवितो. हे त्यांच्या कामगिरीवरून दिसून येत आहे.
नितेश राणे हे नेहमीच स्वतःशी प्रामाणिक असतात. सहजतेने यश स्वीकारतात आणि जबाबदारी निभावण्यासाठी सज्ज होतात. लोकांना खूश करण्यासाठी मुखवटा चढवणं हे त्यांना कधी जमल नाही. मनमोकळा प्रांजळपणा हीच त्यांची ओळख व ताकद आहे. मग कोणाला वाईट वाटलं तरी त्याची त्यांनी कधी पर्वा केली नाही. मनात एक आणि जनात दुसरं असं दुहेरी वागणं काही राजकीय नेत्यांचे दिसून येते, पण नितेश राणे त्यालाही अपवाद आहे. कोणत्याही गोष्टींबद्दल त्यांची मतं स्पष्ट, मुद्देसूद, अभ्यासू व परखड असतात. राजकारणात धसमुसळेपणा न करता संयम, योग्य दृष्टिकोन यांच्या बळावर त्यांनी कितीतरी अवघड क्षणांना जिंकलं. त्यांनी अनेक मित्र, सहकारी जोडले हे त्यांचे बळ आहे. एक राजकारणी म्हणून त्यांच्याकडे वेगळेपण नेहमीच जाणवते. जे वाटते ते मनमोकळेपणानं ते व्यक्त करतात. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची मंत्रालयाच्या तळमजल्यावरील त्यांच्या दालनात ये-जा कायम असते. त्यांचा मिश्किल स्वभाव पत्रकारांना खूप आवडतो. वागण्या, बोलण्यातही आडपडदा नसतो. छोट्या-मोठ्या स्वार्थासाठी त्यांनी कधी स्वतःची मते नेत्यांसमोर लपविली नाहीत. नितेश राणेंच्या या रोखठोक बाण्यावर अनेक नेते खूश असतात. मराठी भाषेवर त्यांचं त्यांच्या वडिलांप्रमाणेच प्रभुत्व आहे. विषयाची वस्तूनिष्ठ मांडणी करणारा आणि आपली मते स्पष्ट शब्दांत मांडायला न बिचकणारा हा नेता भविष्यात खूप मोठा होईल अशी चर्चा राजकीय निरीक्षकांमध्ये ऐकायला मिळते. कोकणातील एक धडाडीचे नेेतृत्व कोकणाला लाभलं आहे आणि त्याचे त्यांना निर्विवाद यश लाभल्याशिवाय राहणार नाही.
त्यांच्या स्वभावात स्पष्टपणा,आक्रमकपणा आणि हजरजबाबीपणा हे तीन गुण दिसतात. कोकणातील विकास कामाबाबत ज्यावेळी मंत्रालयात अधिकाऱ्यांबरोबर ते सातत्याने बैठका घेत असतात. कॅबिनेट मंत्री म्हणून संपूर्ण राज्याची जबाबदारी खांद्यावर असताना कोकणाकडे त्यांचे खास लक्ष असते. विशेषता ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने झटत असतात. प्रशासनावर असलेला वचक, दरारा पाहिला की पत्रकारांना नारायण राणे यांची आवर्जून आठवण होते. कोणताही विषय, समस्या समजून घेण्याची हातोटी आणि तत्काळ निर्णय घेण्याचा स्वभाव, अभ्यास पाहिला की काम मार्गी लागलेच समजायचे. त्यांनी मंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यावर एक प्रथम चांगली गोष्ट केली, तर रोज आढावा बैठक घेऊन प्रशासनाला कामाला लावले. त्यांनी सिंधुदुर्गात पालकमंत्री या नात्याने प्रत्येक खात्याची आढावा बैठक घेऊन पावसाळा पूर्व कामांची दखल घेतली. त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला. ते दिवसभरातील आपला फावला वेळ कोकणातील कामांचा पाठपुरावा करण्यासाठी घालवतात. त्यांचे सतत अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना फोन असतात आणि त्यांना जागे करीत असतात, हे अनेकांना माहिती नसेल.
पूर्वी मत्स्य आणि बंदरे विकास खात्याचे जे कोणी मंत्री व्हायचे ते आहेत की नाही, हे माहीत देखील नसायचे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस यांनी एक चांगलं काम केलं. ते मंत्रीपद साजेसे, कर्तृत्ववान व्यक्तीला दिले. जेथे कोकणासाठी काम करायला मोठी संधी आहे. त्याचा लाभ कोकणी माणसांना होईल हा विचार करूनच नितेश राणे यांना दिले. त्यांनी मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यावर विकासाची एकही संधी दवडली नाही. एक एक दिवस अत्यंत महत्त्वाचा समजून काम करत आहेत. कष्ट करण्याची तयारी, जिद्दीपणा, रात्रभर विधिमंडळ आणि प्रशासन, नियमांचा अभ्यास, चिकाटी व कणखरपणा आणि शिस्त वेळोवेळी दिसली, पण त्यांच्या स्वभावात हापूस आंब्याचा स्वाद आहेच आणि फणसाचा रसाळपणासुद्धा आहे. त्यांच्यात कितीही आक्रमकपणा असला तरी परिस्थितीनुसार स्वतःला आवरण्याची, सावरण्याची क्षमता आहे. कोकणात पक्ष संघटना वाढविणे यावर त्यांनी जोर दिला आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रकल्पांवर ते स्वतःला झोकून देत काम करत आहेत. त्यापैकीच सर्वात महत्त्वाचा आणि केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला वाढवण बंदर प्रकल्प हा एक आहे.
जगातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे वाढवण बंदर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात उभे राहत आहे. बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांची संपूर्ण ताकद आणि क्षमता ही वाढवण बंदराच्या निर्मितीसाठी अक्षरश: झोकून दिली आहे. केंद्र सरकारचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि वाढवण बंदराचा सर्वात मोठा लाभ महाराष्ट्राला होणार आहे. राज्य सरकारने वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळास एकूण प्रकल्पाच्या २६ टक्के सहभाग देण्याकरिता ३ हजार ४० कोटींचा निधी मंजूर करून उपलब्ध करून दिला आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला असून राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्याचा आर्थिक व औद्योगिक विकास साधण्याकरिता बंदरे क्षेत्राच्या विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जलवाहतुकीच्या माध्यमातून आयात आणि निर्यातीकरिता आधुनिक पायाभूत सुविधांसह राज्यात विविध बंदरे प्रकल्प निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच भविष्यकाळाची ही गरज लक्षात घेऊन जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे सॅटॅलाईट पोर्ट म्हणून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवण बंदर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढवण बंदर हे देशातील सर्वात मोठे बंदर ठरणार असून या प्रकल्पाचा एकूण खर्च ७६ हजार २२० कोटी इतका आहे. हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण व महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त भागीदारीतून मे वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड या मार्फत विकसित करण्यात येणार आहे. वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड यामध्ये जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण एकूण प्रकल्पाच्या ७४% खर्च करणार असून २६ टक्के हिस्सा महाराष्ट्र सागरी मंडळ खर्च करणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने याआधी महाराष्ट्र सागरी मंडळाला या बंदर उभारणीसाठी २६ टक्के रक्कम म्हणून ३ हजार ४० कोटी इतका निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड यांच्याकडून मिळणाऱ्या महसुलातील वाटा सदर निधीच्या समप्रमाणात राज्य शासनास द्यायचा आहे. कर्ज उभारणीस देखील मान्यता मिळवून दिली आहे. वाढवण बंदराच्या उभारणीनंतर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मोठे योगदान या माध्यमातून दिले जाणार आहे. महाराष्ट्रात आगामी काळात हा प्रकल्प सर्वात मोठा गेम चेंजर ठरणार आहे.