
नरेंद्र मोहिते राजापूर
आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि जिद्दीने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमटविताना राज्याच्या राजकारण आणि समाजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे एक अभ्यासू आणि तेवढेच आक्रमक नेतृत्व म्हणजे राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे होत. त्यांचा प्रत्येक विषयांवर असलेला गाढा अभ्यास, राज्याच्या हिताचा. अन्यायाचा कोणताही विषय असो तो सभागृहात मांडून धसास लावण्याची त्यांची ती पद्धत आणि आक्रमक अशी शैली विरोधकांनाही कायम धडकी भरवते, तर अनेक वेळा सभागृहात ना. नितेश राणे बोलत असले की, जणू नारायण राणेंचाच भास होत असल्याचे अनेक राजकीय विश्लेषक, जाणकार व पत्रकार आजही सांगतात. आपल्या या काम करण्याच्या आगळ्या-वेगळ्या आणि धडाकेबाज पद्धतीने त्यांनी राज्याच्या राजकारणात निर्माण केलेले आपले हे वेगळं स्थान नक्कीच कोकणी माणसासाठी अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे.
एक कुशल संघटक असलेल्या नितेश राणे यांचे काम आपल्या मतदारसंघापुरते वा एखाद्या जिल्ह्यापुरते मर्यादित कधीच नव्हते. संपूर्ण राज्यात त्यांचा दबदबा आहे, राज्यभरात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. भाजपाच्या तरुण नेतृत्वातील एक आक्रमक हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित असलेले नेतृत्व अशीही त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात निघालेल्या सकल हिंदू मोर्चांनी हिंदू संघटित झाले आणि हिंदुत्वाची ताकद हिंदू विरोधकांना चांगलीच कळली. त्यामुळे नितेश राणे... सिर्फ नाम ही काफी है... अशा प्रतिक्रिया कायम उमटत असतात.
तर मराठा समाजासाठीही त्यांचे मोठे योगदान व काम आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात काढण्यात आलेल्या मराठा समाज बांधवांच्या मूक मोर्चांमध्ये नितेश राणे यांचा सक्रिय सहभाग व मोलाचा वाटा होता. एक समाज बांधव म्हणून त्यांनी मराठा समाजाच्या बांधवांच्या पाठीशी कायमच भक्कमपणे उभे राहत पाठबळ दिलेले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा हक्काचा नेता अशी त्यांची राज्यात मराठा समाज बांधवांमध्ये ओळख आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल टाकत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे व मंत्री नितेश राणे यांनी समाजकारणात व राजकारणात पाऊल टाकले. वडिलांचा राजकीय वारसा चालविताना या दोन्ही बंधूंनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. सर्वसामान्य माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे याचा ध्यास घेऊन खा. राणे काम करतात, तोच वारसा घेऊन समाजातील सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा ध्यास घेऊन राणे बंधू काम करत आहेत.
नितेश राणेंनी सन २०२४ मध्ये कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी होत हॅटट्रीक साधली. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली आणि कोकणातच नाही राज्यभरात त्यांच्या चाहत्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताच नितेश राणेंनी या विभागातील निर्णयांचा जो धडाका सुरू केला त्याने या खात्यात आमूलाग्र असे बदल झाले व होत आहेत.
मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देत सर्वसामान्य मच्छीमार बांधवांसाठी मोठे काम केले. याचा फायदा सर्वसामान्य मच्छीमार बांधवांना होणार आहे. या विभागाचा कारभार अधिक गतीमान करताना राणे यांनी मच्छीमारांच्या विकासासाठी काम करतानाच बंदरांच्या विकासाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमणे काढून त्यांनी या बंदराचा चेहरा-मोहराच बदलला आहे. आजवर जे शक्य झाले नाही ते राणे यांनी काही महिन्यांत करून दाखविले आहे. कोकणातील मच्छीमार बांधव, त्यांच्या समस्या याची चांगली जाण त्यांना असल्याने त्यांनी आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून केलेले काम व कामाचा लावलेला धडाका भविष्यात कोकणातील मत्स्य व्यवसायाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. त्यांनी आपल्या कामाने अवघ्या काही महिन्यांतच या खात्याला एक वेगळी ओळख राज्याच्या मंत्रिमंडळात निर्माण करून दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी सिंधुदुर्गवासीयांसाठी सुरू केलेले काम, अनेक योजना पाहिल्यावर आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचण्याचा कसा ते प्रयत्न करतात हे दिसून येते. कोणतेही संकट असो, आपत्ती असो, कोणताही प्रश्न असो वा वैयक्तिक कुणाची समस्या असो ते तेवढ्याच तत्परतेने आणि आत्मीयतेने तेथे पोहोचतात आणि सोडवतात ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या कामाची पद्धत, झपाटा पाहिल्यावर अनेकांना त्या काळातील राज्याच्या मंत्रिमंडळात काम करणारे राज्याचे नेतृत्व करणारे नारायण राणे आठवतात.
एक कुशल संघटक असलेल्या ना. नितेश राणे यांच्यावर भाजपा नेतृत्वाने राज्यातील पक्ष संघटनेचीही जबाबदारी दिलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे ते संपर्क मंत्री आहेत. त्यामुळे आपल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांचे कायमच मार्गदर्शन व भक्कम पाठबळ असते. प्रत्येकाने आपल्या कामातून पक्ष संघटना अधिक बळकट करावी याकडे त्यांचे विशेष लक्ष असते. महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने आगळी-वेगळी छाप पाडणाऱ्या या युवा नेत्याला वाढदिवसाच्या आणि भविष्यातील राजकीय वाटचालीला हार्दिक शुभेच्छा…!