हिंदू नेता अन् कृतिशील मंत्री

  19

अनघा निकम मगदूम : रत्नागिरी


अनेकवेळा काही ऐतिहासिक आणि मोठं घडायचं असेल तर नियती आपला वेळ घेते आणि मगच योग्य माणूस आणि योग्य वेळ आल्यावरच अशा महत्वपूर्ण कृती घडतात. रत्नागिरीकरांच्या बाबतीत सुद्धा हेच घडले. मिरकरवाडा जेटीवरील अतिक्रमणे हा शासकीय पातळीवरील विषय, पण गेली अनेक वर्ष हा विषय जटील बनत चालला होता. वास्तविक जिल्हा, राज्य आणि देशाला परदेशी चलन मिळवून देणाऱ्या जेटिंपैकी ही एक व्यापारी जेटी. त्यामुळे इथल्या मच्छीमारांना योग्य सुविधा उपलब्ध करून हा व्यवसाय अधिक वृद्धिंगत करून देणे आवश्यक आहे. मात्र अतिक्रमणांमुळे या विकासात्मक कामाला उशीर होत होता. मात्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास खात्याचा कारभार स्वीकारल्यानंतर ना. नितेश नारायणराव राणे यांनी सर्वात प्रथम याच मिरकरवाडा जेटीकडे लक्ष केंद्रित केले आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या कामामुळे २७ जानेवारी २०२५ ला या जेटीने मोकळा श्वास घेतला. आता या जागेचा विकास होणार असून त्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आता ही जेटी, मोठी जेटी बनेल आणि रत्नागिरीचे नाव जगात मत्स्य व्यवसायासाठी कोरले जाईल हे नक्की. मात्र यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या इच्छाशक्ती, नियोजनबद्धता, ठाम निर्धार आणि अचूक वेळी अचूक निर्णय घेणे याच गोष्टी महत्वाच्या ठरल्या.


आपल्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत मंत्री नितेश राणे यांच्या याच नेतृत्वगुणांमुळे त्यांचा कॅबिनेट मंत्रीपदापर्यंतचा प्रवास आश्वासक वाटतो. उच्च शिक्षित असलेल्या मंत्री नितेश राणे यांच्या पाठीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायणराव राणे यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद, नीलमताई राणे यांचे अखंड प्रेम आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची भक्कम साथ, कुटुंबाचे प्रेम सदैव आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे सन २०१४ मध्ये राज्याच्या राजकारणात देवगडचे आमदार म्हणून पदार्पण झाले होते. निवडणूक जिंकली तरी पुढची वाट बिकट होती. अशा बिकट काळात मंत्री नितेश राणे यांनी केलेली राजकीय वाटचाल आश्वासक होती, निश्चयाची होती, निर्धाराची होती. त्यामुळेच आज भारतीय जनता पक्षामध्ये ते एक आश्वासक नेतृत्वगुण असलेले नेते म्हणून घडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगतीशील विचारांना पुढे नेतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी मंत्री म्हणून काम करणारे त्यांचे मंत्रिमंडळातील विश्वासू सहकारी झाले आहेत आणि याचवेळी महाराष्ट्रासह देशात हिंदू धर्मियांसाठी लढणारे लढवय्ये बनले आहेत.


मंत्री नितेश राणे नेहमीच सांगतात मी जन्माने हिंदू आहे, माझ्या धर्माचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि या कर्तव्य पालनात मंत्री राणे कुठेच मागे पडलेले नाहीत. जिथे जिथे हिंदू बांधव, भगिनी अडचणीत असेल तिथे तिथे मंत्री नितेश राणे धावून गेले आहेत. त्यांना न्याय मिळवून दिला आहे. हिंदू धर्माचे महत्व, धर्माची ताकद किती मोठी आहे हे समाजावर पुन्हा एकदा बिंबवण्याचे काम सुरू असताना त्यात मंत्री राणे यांचे काम खूप मोठे आहे. एकीकडे सोशल मीडियामुळे युवा वर्गासमोर अनेक आकर्षणे असताना राज्यात मात्र मोठ्या संख्येने तरुण आपल्या धर्म कार्याकडे वळतो आहे, त्यावेळी मंत्री नितेश राणे यांचे नेतृत्व त्यांना प्रेरणादायी वाटत आहे. एकीकडे महत्वाच्या खात्याचा एक मंत्री म्हणून राज्य विकासासाठी मंत्री राणे महत्वपूर्ण निर्णय घेऊन राज्याची किनारपट्टी बळकट आणि आर्थिकदृष्ट्या उन्नत करत असतानाच एक हिंदू नेता म्हणूनही एक भक्कम समाज बनवण्यासाठी योग्य दिशेने त्यांची पावले पडत आहेत. आज मंत्री नितेश नारायणराव राणे यांचा वाढदिवस. या निमित्ताने आगामी काळात त्यांच्या हातून राज्याची सेवा घडून हिंदू धर्म रक्षणाचे मोठे काम घडो या सदिच्छांसह शुभेच्छा...!

Comments
Add Comment

खात्याची प्रतिष्ठा वाढवणारे मंत्री नितेश राणे

संतोष राऊळ कणकवली मंत्रीपदाच्या काळात खाते कोणतेही असू दे त्या खात्याला प्रतिष्ठा मिळवून द्यायची, त्या खात्यात

जहाल आणि जाज्वल्य

प्रकाश जनार्दन गोगटे देवगड महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे

हिंदुधर्म योद्धा!

प्रियांका साळस्कर : माजी नगराध्यक्षा, देवगड दि.२३ तारीख साहेबांना नेहमीच शुभ ठरली. दि. २३ जून पालकमंत्री तथा

उत्तुंग विचार आणि व्हिजन असलेले नेतृत्व

त्यादिवशी प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर यांचा फोन आला. मला वाटलं आज तो जरा निवांत असावा. म्हणून फोन केला

नितेश राणे… सिर्फ नाम ही काफी है…।

नरेंद्र मोहिते राजापूर आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि जिद्दीने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा

जिल्ह्याच्या विकासासाठी आत्मविश्वासाला कृतीची जोड देणारा नेता...

अॅड. नकुल पार्सेकर : संस्थापक अध्यक्ष, अटल प्रतिष्ठान गेल्या तीस वर्षांत महाराष्ट्रातील राजकारण हे फारच अस्थिर