ज्ञानेश सावंत
नितेश नारायणराव राणे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बुलंद नेतृत्व. खासदार नारायणराव राणे आणि साै. निलमताई राणे यांचे छोटे चिरंजीव. लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू घरातच मिळत गेले, पण तरीही आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी समाजकारणापासून केली. वडील राजकारणात सक्रिय असल्यामुळे ते राजकारणात सहजगत्या येऊ शकले असते, पण तसे न करता त्यांनी समाजकारणाला पसंती दिली. २००६ साली लंडनवरून एमबीए केल्यानंतर त्यांच्यासाठी अनेक मार्ग मोकळे होते, पण त्यांनी समाजकारण हा मार्ग निवडला. समाजातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी स्वाभिमान संघटनेची स्थापना केली.
स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आरोग्य समस्या, बेरोजगारी, शिक्षण समस्या, महिला अत्याचार, नागरिकांचे मूलभूत प्रश्न इ. समस्यांवर आवाज उठवण्याचे काम स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून मुख्यत्वे मुंबई व महाराष्ट्रात केले. टँकर माफियांना उघडे पाडणे असो की, हजारो तरुणांना रोजगार देणे असो… नितेश राणेंची शैली नेहमीच आक्रमक आणि परिणामकारक राहिली. त्यांनी एका दिवसात तब्बल २५ हजार तरुणांना नोकऱ्या मिळवून दिल्या. ही घटना गिनीज बुकमध्ये नोंदवली गेली, तर ‘नोकरी एक्स्प्रेस’ ही संकल्पना देशात पहिल्यांदाच प्रत्यक्षात उतरवणारे ते पहिले नेते होते. २००७ ते २०१४ अशी ८ वर्षे समाजातील वेगवेगळ्या विषयांवर काम केल्यानंतर २०१४ साली ते कणकवली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. आमदार झाल्यानंतर त्यांनी पूर्णपणे स्वतःला या मतदारसंघासाठी झोकून घेतले. डिजिटल शाळा, इंटरनॅशनल स्कूल, वॅक्स म्युझियम, कचरा निर्मूलन प्रकल्प, कंटेनर थिएटर, कलादालन, वॉटर स्पोर्ट्स, रोपवे, गरीब चाकरमान्यांना फक्त १०० रुपयांत मुंबईतून गणेशोत्सवासाठी प्रवास, गरीब रुग्णांना मदत असे अनेक विकासाचे प्रकल्प व लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना त्यांनी मदत केली. गावा-गावांतील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शिक्षणाची सोय असे अनेक उपक्रम राबवले. मधल्या काळात काही राजकीय पक्षांनी हिंदू-मुस्लीम असा नवा डाव स्वतःच्या फायद्यासाठी राबवला. त्यावेळी भाजपा पक्ष श्रेष्ठी व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नितेश राणे यांच्यावर त्या राजकीय पक्षांना मुहतोड जवाब देण्याची जबाबदारी सोपवली. नितेश राणेंनी हिंदुत्वाचा धनुष्य स्वतःच्या खांद्यावर घेतला व पूर्ण महाराष्ट्रभर हिंदुत्वाचा नारा दिला. हिंदूंवरील वाढते अत्याचार पाहून हिंदू समाजाला एकत्र केले, हिंदूंमध्ये धगधगता अंगार फुलविला. हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लव्ह जिहादला बळी पडलेल्या १२ हिंदू मुलींची आतापर्यंत नितेश राणेंनी सुटका केली. त्यांनी केलेला हिंदुत्वाचा एल्गार एवढा जबरदस्त होता की, प्रस्थापितांना त्याची झळ पोहोचू लागली आहे. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या (उबाठा गट) वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी जी त्यांची स्तुती केली ते त्याचेच परिणाम आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली. राज्याच्या मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास खात्याची धुरा मंत्री नितेश राणे यांच्याकडे देण्यात आली. खात्याचा सखोल अभ्यास आणि जनमानसाला आपल्या खात्याचा कसा उपयोग होईल याचा विचार करून त्यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वॉटर टॅक्सीमुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. गणेशोत्सवात कोकणात जाताना चाकरमान्यांना रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडीने होणारी परवड आणि रेल्वेचा वेळखाऊ प्रवास. हा त्रास नेहमीचाच झालाय. आता या त्रासातून दिलासा देण्यासाठी मत्स्य व बंदरे विभागाकडून मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. याकरिता एम टू एम बोट वापरली जाणार आहे. असे धडाकेबाज निर्णय घेणारे व जनमानसांचे प्रश्न सोडवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे साहेबांना वाढदिवसानिमित्त ‘प्रहार’ परिवाराच्या वतीने मन:पूर्वक शुभेच्छा…!