इंजि. अजयकुमार सीताराम सर्वगोड
दयावान कोमल हृदयाचे कार्यसम्राट असे मंत्री म्हणजे ना. नितेश राणे होय. नितेश राणे नाव घेतले की, लगेचच कर्मचारी, अधिकारी वर्गाची धडकी भरते. एक आक्रमक चेहरा जनतेच्या हितासाठी, जनतेच्या प्रश्नांसाठी, गोरगरिबांच्या हितासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असणारा नेता म्हणजे नितेश राणे होय... माझे आणि नितेश राणे यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि भाऊबंधकीचे झाले आहे... मी १२ ऑक्टोबर २०२२ रोजी कणकवली येथे कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नतीने हजर झालो. मला घरातील मंडळी, सर्व नातेवाईक आणि मित्र मंडळी सगळे सांगत होते, अरे अजय कणकवली येथे जाऊ नकोस त्या ठिकाणचे आमदार खूप आक्रमक आहेत. विनाकारण तुला त्रास होईल. तुझी भरपूर सेवा निष्कलंकपणे झाली आहे. एक तर तू बदली करून घे किंवा राजीनामा दे असे सांगत होते. जर आपण राजीनामा दिला किंवा बदली करून घेतली, तर आपण भ्याड ठरू. मी ठरवले काही झाले तरी शेवटची टर्म पूर्ण करायची आणि कणकवली विभागाचा कायापालट करायचा. मी मनाचा निश्चय केला, कणकवली विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करायचा... मी १२ ऑक्टोबर २०२२ रोजी कणकवली येथे कार्यकारी अभियंता म्हणून हजर झालो. साधारणत: २५ ऑक्टोबर २०२२ रोजी नितेश राणे यांना आमदार या नात्याने भेटण्यासाठी गेलो. माझ्याबरोबर माझे एक सहकारी होते. मला पहिल्याच भेटीत आमदार नितेश राणे यांनी सांगितले, सर्वगोडजी आमचे भरपूर उद्योग-धंदे आहेत. आम्ही उद्योग-धंद्यातील कमाईमधील पैसे राजकारणात ओततो. आम्हा राणे कुटुंबाला सिंधुदुर्गवासीयांनी भरपूर काही दिले आहे, आता फक्त आम्हाला विकासाचा गाडा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निरंतर सुरू ठेवायचा आहे. त्यासाठी तुम्ही योगदान द्या. माझ्या मतदारसंघातील रस्ते दर्जेदार असले पाहिजेत. तुम्ही कामाच्या गुणवत्तेत अजिबात तडजोड करू नका, असे ठणकावून सांगितले. मला त्याच क्षणी जाणवले, अरे हा तर विकास पुरुष आहे. याची मला जाणीव झाली. दिवाळी सुरू होणार होती म्हणून मी बंगल्यावर जाताना जवळपास पाच किलो मिठाईचे बॉक्स घेऊन गेलो होतो. मिठाईचे बॉक्स पाहता नितेश राणे भडकले. सर्वगोडजी तुम्ही यापुढे आमच्या बंगल्यावर येताना काहीही घेऊन यायचे नाही. आमच्या वडिलांनी आम्हाला चांगली शिकवण दिली आहे. कर्मचारी-अधिकारी वर्गाचा चहा सुद्धा घेऊ नये. असा आदर्श आम्हाला घालून दिला आहे. तोच आदर्श घेऊन आम्ही पुढे जात आहोत हे ऐकून मी खूप भारावून गेलो. माझ्या मनात नितेश राणे आणि त्याचे वडील माजी मुख्यमंत्री सध्याचे विद्यमान खासदार नारायण राणे साहेब यांच्याबद्दल प्रचंड आदर वाढला. मी ठरवले अरे हे राणे कुटुंब अगदी जगावेगळे आहे. राणेंची खासियत औरच आहे यात काही शंका नाही त्यामुळे त्याच क्षणी ठरवले या कुटुंबासाठी आणि या जिल्ह्यासाठी मरेपर्यंत कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करायची. मी जवळपास अडीच वर्षे कार्यकारी अभियंता म्हणून त्याच्या मतदारसंघात काम केले. या मतदारसंघात मी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड काम केले. यासाठी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी निधी देण्यासाठी मोलाची साथ दिली. मला नितेश राणे आणि त्यांच्या कुटुंबाकडून प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकीचे यथार्थ दर्शन झाले. मी त्यांच्या सहवासात भारावून गेलो. माझ्या मुलाचा विवाह सोहळा १९ नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे येथे संपन्न झाला. मी मुलाच्या लग्नाची पत्रिका नितेश राणे यांच्या बंगल्यावर घेऊन गेलो असता पत्रिका दिल्यानंतर नितेश राणे बोलले, मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी आणि कितीही महत्त्वाचे काम असले तरी तुमच्या मुलाच्या लग्नाला पुणे येथे येणार. मला क्षणभर थोडे आश्चर्य वाटले कारण नितेश राणे यांच्यावर पक्षाने तेलंगणा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमधून माझ्या मुलाच्या लग्नाला येतील अशी सुतराम शक्यता नव्हती. मी स्मित हास्य केले आणि त्यांच्या बंगल्यातून बाहेर पडलो. बाहेर पडत असताना नितेश राणे म्हणाले सर्वगोडजी मला माहीत आहे तुम्ही भ्रष्टाचाररहित अधिकारी आहात. तुम्ही कोणाचाही एक रुपया घेत नाही. हे नितेश राणे यांचे उद्गार ऐकताच माझे मन भरून आले, डोळे किंचितसे पाणावले. मला थोडे आश्चर्य सुद्धा वाटले आणि त्याच क्षणी जाणवलं की हा महान नेता खरा कोकणी माणूस आहे.
कोकणी माणूस फणसासारखा असतो. वरून न टोचणारे काटे आणि आतून मधुर आणि गोड गरे, अत्यंत कोमल हृदयाचे. इतरांबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी जपणारा... लग्नाच्या दिवशी सकाळी १० वाजता मी साहेबांच्या बंगल्यावर फोन केला, नितेश राणे १० वाजता तेलंगणामध्ये होते हे ऐकून माझे मन जरा खिन्न आणि दुःखी झाले आणि माझी खात्री पटली नितेश राणे हे मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीत... लग्न समारंभ ८ वाजता पार पडणार होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चक्क नितेश राणे ७.३० वाजता लग्न सोहळ्यासाठी उपस्थित झाले. मी आणि माझे कुटुंब, मित्र परिवार आणि उपस्थित मान्यवर त्यांना पाहून भारावून गेलो. लग्न समारंभासाठी आलेले लोक सुद्धा अचंबित झाले. महाराष्ट्राचा दबंग नेता, आक्रमक नेता तेलंगणाहून खासगी विमानाने एवढा मोठा खर्च करून एका अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न समारंभाला उपस्थित झाला. कामापलीकडे व्यक्तिगत नाते जपणारा, प्रेम, जिव्हाळा देणारा नेता म्हणजे नितेश राणे होय! असे म्हटले तर वावगे होणार नाही. मला नितेश राणे यांचे खरोखर कौतुक आणि अभिमान सुद्धा आहे... सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेचा आमच्या विभागाशी काडीचा संबंध नसताना केवळ विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सा. बां. विभागाला आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र विरोधक यांनी रचले होते. यामध्ये मला अगदी मोलाची खंबीर साथ नितेश राणे यांनी दिली. हे त्यांचे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. आज या महान नेत्याचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होत आहे हे मात्र नक्कीच.