लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर होत आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. भारताने या सामन्यातील दुसऱ्या डावात ३६४ धावा केल्या. यासोबतच भारताने कसोटीत विजयासाठी इंग्लंडसमोर ३७१ धावांचे आव्हान ठेवले आहे.
दुसऱ्या डावात भारताने केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांच्या शतकी खेळाच्या जोरावर साडेतीनशे पार धावा केल्या. सलामीवीर केएल राहुलने १३७ धावा तडकावल्या. त्याने २४७ बॉलमध्ये १८ चौकार ठोकत १३७ धावा केल्या. साई सुदर्शनने ३० धावा केल्या. ऋषभ पंतने पहिल्या डावा प्रमाणेच दुसऱ्या डावातही शतक ठोकले. त्याने १४० बॉलमध्ये ११८ धावा ठोकल्या. बाकी इतर कोणत्याही फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. ३४९ धावांवर भारताने तीन गडी गमावले. लोकेश राहुलची विकेट पडल्यानंतर भारताचा डाव सावरूच शकला नाही.
या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपला. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारावर टीम इंडियाला केवळ ६ धावांची आघाडी मिळाली होती.